Monday, December 30, 2013

वास्तुशास्त्राचा पंचनामा


वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला आहे. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे, ह्या भाबड्या समजुतीमुळे या शास्त्राचा महिमा वाढला आहे. वास्तुशास्त्रद्यांनी सामान्यजनांच्या या भाबडेपणाचा फायदा घेतला आहे.

Vastu Shastra
एका वास्तुशास्त्र ज्योतिषाला कुणीतरी विचारले --
"पेशावाईची भरभराट का झाली?"
"शनिवार वाड्याचे तोंड उत्तरेकडे होते म्हणून!"
"मग पेशवाई का बुडाली?"
"वाड्यात जाताना तोंड दक्षिणेला होत होते म्हणून!"

वास्तुशास्त्रातले शास्त्र काय आहे हे स्पष्ट करणारा हा संवाद आहे. गेल्या ३०-४० वर्षात वास्तुशास्त्राचे थोतांड इतके माजले आहे की अनेकजण त्याचा गंभीरपणे विचार करायला लागले आहेत. भरमसाठ पैसे आकारून, लोकांच्या भावनांशी खेळून, घरामध्ये वाट्टेल तसे बदल करायला लावून या सर्व भंपकपाणाला शास्त्राचा आणि विज्ञानाचा मुखवटा चढवण्यात हे लोक यशस्वी झाले आहेत.

वास्तूमध्ये जे बदल करणे शक्य नसते असे बदल करायला सांगणे, घराची मूळ मांडणीच वास्तुशास्त्राला धरून नसल्याने त्या घरात विविध समस्या निर्माण होत आहेत अशी भीती घालणे अशा उपायांनी हे वास्तुशात्राचे प्रणेते आपल्या धंद्याचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यामुळेच ठेच जरी लागली तरी त्याला वास्तुच कारणीभूत असल्याचा कांगावा केला जात आहे.

साधारणपणे १९७० च्या आसपास मुंबई-पुण्यातील जुन्या चाळी आणि वाडे पाडून त्याठिकाणी ओनरशिप फ्लॅट बांधण्याच्या कामास वेग आला. गरजू लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा व्यवसाय फ़ोफ़वला. त्याकाळी घरबांधणीसाठी सुलभपणे कर्ज मिळत नव्हते आणि आजच्यासारखी गृहबांधणी व्यवसायाला भरभराट आलेली नव्हती. त्यामुळे बिल्डर लोकांनी मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी प्रभावी विक्रीकौशल्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने वास्तुशात्राची नवी आयडिया काही लोकांच्या डोक्यातून बाहेर पडली आणि "वास्तुशास्त्रानुसार सदनिका" अशा जाहिरातींचे पेव फ़ुटले.

वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे आणि त्यामुळे आपल्या निवासस्थानाचा उपयोग आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी होऊ शकतो ह्या भाबड्या समजुतीला ह्या शास्त्राने पाणी घातले. बिल्डर लोकांनी सामान्यजनांच्या ह्या भाबडेपणाच्या पुरेपूर फायदा घेतला आणि वास्तुशास्त्रज्ञांची एक नवी पलटण या क्षेत्रात उतरली.

याच चाणाक्ष लोकांनी बांधलेल्या घरातील "दोष" शोधायला सुरुवात केली. पद्धतशीरपणे सापळा रचून प्राचीन शास्त्र, पुराणे, पुरातन मंदिरे, रामायण-महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथातले दाखले देऊन भोळ्या लीकांच्या श्रद्धेच्या आधारे आपल्या व्यवसायाचा पाया भक्कम केला. अध्यात्म, मानसशास्त्र, पुराणातील भाकडकथा, जोतिषशास्त्र अशा सर्व साधनांची आपल्या मनाप्रमाणे मोडतोड करून आधुनिक वास्तुशास्त्र निर्माण करण्यात आले. शास्त्र म्हटले की नियम आले. कार्यकारण संबंध आला. माती, पाणी, उजेड, वारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्व या सर्व नैसर्गिक तत्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजे वास्तुशास्त्र. भूकंपप्रवण क्षेत्र, समुद्रकिनारे, डोंगराळ भाग, उष्ण-शीत कटिबंध, वाऱ्याची दिशा, पावसाचे प्रदेश अशा गोष्टींचा विचार वास्तू बांधताना करणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थळ, काळ, हवामान परिस्थिती, उपलब्ध साधनसामग्री यांचा विचार ह्या शस्त्राने केला पाहीजे. परंतु आधुनिक वास्तुज्योतिषी सांगतात त्याप्रमाणे एकच एक नियम सर्वत्र लागू पडत नाही. बऱ्याच वेळेला घर बांधणारा मालक इंजिनिअरचा सल्ला बाजूला ठेवून वास्तुशास्त्रज्ञाच्या मताला प्राधान्य देतो. स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासापेक्षा या पारंपारिक ज्योतिषांच्या अभ्यासाला प्राधान्य दिले जाते.

काही जुन्या भारतीय ग्रंथात वास्तुनिर्मितीचे उल्लेख आहेत. पण ते फक्त महाल, राजवाडे, प्रासाद, मंदिरे, उद्याने यांच्याच संदर्भात आहेत. वास्तुज्योतीषी अशा गोष्टींचे आपल्या पुस्तकात मोठे भांडवल करतात. परंतु त्या शास्त्राप्रमाणे बांधलेल्या वास्तू आज अस्तित्वात नाहीत. ह्या माहितीत वस्तुस्थितीपेक्षा कल्पनाविलासच जास्त आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक वास्तुशिल्पे, मंदिरे आज दिसतात. परंतु त्यांचा इतिहास गेल्या हजार-बाराशे वर्षा इतकांच आहे. अनेक भग्न मंदिरे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत असेही नाही. विश्वकर्मा हा "आद्यवास्तुविशारद" मानला जातो. परंतु त्याला पुराणाशिवाय कोणताही आधार नाही. इजिप्तच्या "इम होतेप" याने आश्चर्यकारक वास्तुनिर्मिती केली. पाच हजार वर्षापूर्वीच्या या वास्तू आजही पहावयास मिळतात. मोहेंजोदाडो-हडप्पा येथील नगररचनाही तितक्याच जुन्या आहेत. त्यातील वास्तुशास्त्रही थक्क करणारे आहे. परंतु या वास्तुशास्त्राचा कोणताही मागोवा न घेता आज जे वास्तुज्योतिषी या शास्त्राच्या प्राचीन परंपरेचा उल्लेख करत आहेत तो केवळ आपमतलबी आणि स्वार्थप्रेरक आहे असेच म्हणावे लागेल.

धरणीमाता अन्न, वस्त्र, निवारा देते. ती कुणातही भेदभाव करत नाही. ती पवित्र असली तरी वास्तुनिर्मिती करताना कृमि, किटक, जंतू आणि प्राणी यांची अकारण हत्या होते. काही प्राणी निराधार होतात. कुदळीचे घाव घालून आपण त्या मातेला उपद्रव देतो. त्या कृतीचे पापक्षालन म्हणून आपण त्या स्थानी भूमिपूजन करतो. वास्तुशांती करतो. आग्नेयाला अग्नी प्रज्वलित करणे इत्यादी धार्मिक कार्ये श्रध्दापूर्वक करतो आणि नंतर त्या वास्तूत आनंदाने राहावयास जातो. हीच आपली खरी प्राचीन परंपरा. परंतु वास्तुशास्त्र नावाचे आधुनिक शास्त्र "शोधून" त्याच्या आधारे नवीन वास्तू बांधली नाही तर आपले वाटोळे होईल असा किडा एकदा डोक्यात वळवळू लागला की शास्त्र संपते आणि भ्रम सुरु होतो.

वास्तुज्योतिषशास्त्राची भरभराट होण्याचे एक मोठे कारण म्हणजे या क्षेत्रात प्रचंड पैसा दडलेला आहे. फलज्योतिषी, हस्तसामुद्रिकया क्षेत्रात घुसले. मंगळ वक्री आहे म्हणून समस्या निर्माण होत आहेत असे म्हणण्याऐवजी घराचा संडास ईशान्येला आहे म्हणून समस्या निर्माण आहेत असे म्हटले जावू लागले. वृत्तपत्र आणि टीव्हीवर जाहिरात करून, मेळावे घेऊन लोकांना ह्या शास्त्राच्या जाळ्यात ओढले जावू लागले. फलज्योतिषाला विचारले जाणारे प्रश्नच वास्तुज्योतीषाला विचारले जावू लागले आणि या वास्तुज्योतिषांना घबाडयोग साधला.

सामान्यपणे मनुष्याला भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे मुलाला नोकरी नाही, मुलामुलींची लग्ने जुळत नाहीत, नवरा-बायकोचे पटत नाही, सासू-सुनेचे पटत नाही, आजारपण सुटत नाही इत्यादी. कर्ज, विवंचना, व्यसनाधिनता, धंद्यामध्ये नुकसान आणि आयुष्यातले अपयश, मिळकत आणि खर्चात तफावत, यश मिळत नाही, इस्टेटीसाठी भाऊबंधकी अशा असंख्य कारणांमुळे माणसे बेजार असतात. कोणी करणी केली आहे, कुणाची नजर लागली आहे अशा सतत संशयाने ते पछाड्लेले असतात. एका मानसिक भीतीच्या दडपणाखाली ते वावरत असतात. अशा वेळी घराची मांडणी वास्तुशास्त्राला धरुन नसल्यानेच या समस्या निर्माण झाल्याचे त्यांना सांगितले तर त्यांचा त्यावर सहज विश्वास बसतो. या मानसिकतेचा कौशल्याने उपयोग करुन त्यावर भरभक्कम मोबदला घेतला जातो. शयनगृहाची जागा बदला, बैठकीचे ठिकाण बदला, पाण्याची टाकी दुसरीकडे हलवा अशा असंख्य सुचना केल्या जातात. एकदा या शास्त्राचा मनावर पगडा बसला की येणारे कोणतेही संकट वास्तूदोषामुळे येते असा समज बळावतो. त्यातूनच लोक आपले मानसिक संतुलन घालवून बसतात. एखाद्या अधिक कमकुवत मनाच्या व्यक्तीचे आयुष्यही त्यामुळे बरबाद होवून जाते.

वास्तुशास्त्र उर्फ वास्तुज्योतीषाचे आज पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. हे शास्त्र आता लोकांच्या पैशावर चांगलेच भरभराटीला आले आहे. पैसा दिला तर दोष लगेच नाहीसा होतो. जाहिरात करून मूर्ख व अज्ञानी लोकांना कसे फसवावे हे शास्त्र चांगले विकसित झाले आहे. मी अमक्या वास्तुज्योतीषाचे मार्गदर्शन घेतल्यामुळे माझा तमका फायदा झाला असे सांगणारे अनेकजण ह्या जाहिरातबाजीच्या विळख्यात अडकले आहेत. याचा आधार अमक्या पुराणात आहे असे नुसते सांगावयाचा अवकाश, श्रद्धावान भाविकांची डोळे झाकून, बुद्धी गहाण टाकून तिकडे मेंढरासारखी धावाधाव सुरु होते.

काही ठिकाणी तोडफोड करणे शक्य नसते त्यामुळे लोक तोडफोड करुन मोठ्या खर्चात पडायला तयार होत नाहीत. यांवरही वास्तुज्योतीष्यांकडे फर्मास उपाय आहेत. वास्तुदोष घालवण्यासाठी मंत्रांनी सिद्द्ध केलेली यंत्रे, रत्ने, माळा, फोटो, पादुका, घंटा, बासऱ्या, नाग, करंडे, झाडांची मुळी, त्रिशूळ असे असंख्य उपाय हजर असतात. हे किमती तोडगे खास तुमच्यासाठी नाममात्र किमतीला देऊ करणारे काही महापरोपकारी वास्तुज्योतिषीही आहेत. ऑपरेशन न करता केवळ मंत्र म्हणून अपेंडिक्स बरा होऊ शकतो. पण श्रद्धा नसेल तर मात्र का गुण येणार नाही असे म्हणणाऱ्या मांत्रिकासारखाच हा प्रकार असतो.

वास्तुशास्त्राचा गाभा म्हणजे अष्टदिशा आणि त्यांचे स्वामी! पुराणकर्त्यांनी एक एक दिशेला एक एक स्वामी नेमला आहे. ह्या स्वामींच्या आवडी-निवडी व स्वभाव त्यांनीच ठरवले आहेत. मनासारखे घडले तर ते प्रसन्न होतात. प्रमाद घडला तर उपद्रव करतात. दिशा हि संकल्पनाच वास्तुशास्त्राने शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट केलेली नाही. विज्ञानाच्या कसोटीवर ती टिकू शकत नाही. पृथ्वी स्थिर आहे अशा गृहीतावरच हे आधारित आहे. सुर्य, चंद्र, गृह, तारे, ब्रह्मांड यांची गती व पृथ्वीची स्वतःची गती ही संकल्पनाच विचारात घेतली जात नाही. दिशा ही सापेक्ष आहे. ती कुठल्याच गोष्टीचे कारण असू शकत नाही आणि त्यामुळे ह्या दिश्यांच्यावर आधारलेले शास्त्र वैज्ञानीक निकषावर टिकू शकत नाही. ऊर्ध्व आणि अधो ह्या दोन दिशाही वास्तुज्योतीषी विचारात घेत नाहीत. त्यामुळेच दिशा हि संकल्पनाच ह्या क्षेत्राला पेलवलेली नाही हे स्पष्ट होते.

वास्तुपुरुष हि प्राचीन संकल्पनाही अशीच विवादास्पद आहे. पुराणात ह्या संबंधीच्या ज्या कथा आहेत त्यानुसार वास्तुपुरुष म्हणजे -

१. शंकराच्या घामापासून निर्माण झालेले भूत
२. वास्तोष्पति नामक प्राचीन वैदिक देवता
३. छगासुर नावाचा राक्षस
४. पृथ्वी आणि आकाश यांना रोखणारे महाभूत

या सर्वांना वास्तुपुरुष असे म्हटले जाते. या वास्तुपुरुषाला ब्रम्हदेवाने असे वरदान दिले की पृथ्वीवरील लोक वास्तु निर्माण केल्यानंतर तुझी पूजा करतील व तुला बलीभाग अर्पण करतील. त्यांनी असे न केल्यास त्या घरातील व्यक्ती, धनधान्य आणि समाधान या सर्वांना तू खाऊन टाक. कोणत्या धर्मात असा लोकांना खाऊन टाकणारा देव असेल? वास्तुशात्र हे मुख्यतः पुराणे व पुराणांचेच सहोदर असणारे "समरांगण सूत्रधार" आणि "मनसार" या ग्रंथांवर आधारित आहे. अशी पुराणे कोणत्याही शास्त्राचे प्रमाण म्हणून स्वीकारता येत नाहीत. त्यांच्यातील विसंगती, भिन्न विचार आणि विज्ञानाच्या पायावर न टिकणारी गृहिते, कर्मकांडांचा अतिरेक यामुळे शास्त्रापेक्षा धर्माला विकृत स्वरूप देण्याचेच कार्य त्यांनी केले आहे. विचारवंतांनी आधुनिक काळामध्ये स्वीकारलेला बुद्धिप्रामाण्यवाद आणि तर्कशक्ती यांच्या आधारावरच या वास्तुशास्त्राचा विचार करावा लागतो व याठिकाणी ते शास्त्र मानवी संशयाचे निराकरण करण्यास पूर्णपणे अपुरे ठरते.

वास्तुशास्त्राचा एवढा प्रचंड हलकल्लोळ माजल्यानंतर आणि या क्षेत्रात अनेक नवनवे अभ्यासू तज्ञ उतरल्यानंतरही या क्षेत्राचे अनभिज्ञपण कमी होत नाही. तरीही मानवी स्वभावाला अगम्य गोष्टींचे असणारे आकर्षण आणि अज्ञाताची ओढ यामुळे या वास्तुशास्त्राच्या अभ्यासाची गोडी अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. श्रद्धावान माणसांनी त्याचे परिशीलन करण्यास हरकत नाही. परंतु वास्तुशास्त्राच्या एका अभ्यासकाने आपल्या पुस्तकात दिलेला हा इशारा मात्र लक्षात ठेवावा असा आहे --
या पुस्तकातील उपाय, तोडगे करुन पहावेत. फरक न पडल्यास लेखक जबाबदार राहणार नाहीत. पडणाऱ्या अगर न पडणाऱ्या फरकाचा दावा लेखक उचलत नाही. 
या वक्तव्याला कोणत्या भाष्याची गरज आहे काय?

(लेखक: सदानंद उकिडवे)

Saturday, December 21, 2013

पार्टी

आई, तू म्हणाली होतीस,..... पार्टीला जायचंय, तर जा...... पण ‘पिऊ’ नकोस.. .... आई, खरं सांगतो. ......मी नाही प्यायलो.... मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो. सोडा असलेलं.....! आई, खूप आग्रह केला मित्रांनी..... म्हणाले पी रे. पी रे..... पण नाही प्यायलो मी..... सगळ्यांनी चिडवलं मला, भरीस पाडलं...... पण मी नाहीच ग्लासला हात लावला...... तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. ......न पिण्याचं.!..... आई, कोणी काहीही म्हणो... न पिता एन्जॉय करता येत...ं हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं...... मला गरजच नाही वाटली नशेची.!... आई, पार्टी संपत आली आहे आत्ता.... जो तो घराकडे निघालाय.... खूप पिऊन ‘टाईट’ झालेले :....माझे मित स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत..... मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय..... निघालोय. पूर्ण शुद्धीत..! मी येईन घरी धडधाकट..... नशेत गाडी ठोकण्याचा,... काहीबाही होण्याचा प्रश्नच नाही मी प्यालोच नाही..... तर बेभान होण्याचं काही कारणही नाही.... आई, मी निघालो.... गाडी काढतच होतो बाहेर.... पण पाहतो तर काय.... समोरून एक गाडी सुसाट येताना दिसतेय...... माझ्या जवळ अगदी जवळ येतेय ती..... माझ्या गाडीवर..आदळतेय.. आई, मी पडलोय गाडीबाहोर... काहीच कळत नाहीये... अंगातून काहीतरी ...कारंजं फुटल्यासारखं उडतंय. कोणीतरी ...हवालदार ओरडतोय जोरजोरात..... दारू पिऊन ...बुंगाट गाडी चालवत होती ती पोरं... त्यांच्या गाडीनं ठोकलं याला... मरणार हे पोरगं हकनाक... आई,. मला वेदना होताहेत गं खूप... तू जवळ असावीस असं वाटतंय.... मी. मी.? आई. मला का ठोकलं गं त्यांनी.... रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मी.... जमलेत इथे सगळं जण... डॉक्टर, पोलीस, .. ते डॉक्टर म्हणताहेत.... .काही चान्सेस नाही,.. संपलंय सारं... काहीच उपाय नाही.. नाही वाचणार हा... .आई, तुझी शपथ... मी ‘प्यायलो’ नव्हतो गं.... त्या गाडीतली मुलं नशेत होती... खूप प्यायली होती.... दारू पिऊन गाडी चालवत होती.. आई, ती मुलंही माझ्याच बरोबर... त्या पार्टीत होती बहुतेक... फरक इतकाच.. की प्यायले ते आणि मरतोय मी.!... का पितात गं आई हे लोकं.....? सगळं आयुष्य नासवतात.. स्वत:चं. आणि दुसर्यांचंही. !... आई, मला आता असह्य वेदना होतायंत.... आतल्या आत काहीतरी चिरत,.. .कापत जातंय... आई,.. .ज्या मुलाने माझी ही अवस्था केली... तो शुद्धीत येतोय आता.... .मी कळवळतोय आणि तो फक्त पाहतोय.... सुन्नपणे. ! आई, माझ्यासारखंच त्यालाही ...कुणीतरी सांगायला हवं होतं.... दारू पिऊन गाडी चालवू नकोस. .......त्यानं ते ऐकलं असतं तर आज मी जिवंत राहिलो ....असतो गं. आई, मला आता श्वास लागायला... लागलाय. तुटायला मी अख्खा. ...आतल्या आत. पण... तू नाही रडायचंस ...... मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती..... तेव्हा तेव्हा होतीस तू बरोबर. माझ्यासाठी.!... पण मरताना मला ... एक शेवटचा प्रश्न पडलाय... जर मी दारू पिऊन. ... नव्हतो तर मग..... मी का मरायंचं?... दुसर्याच्या चुकीची शिक्षा..... मीच का भोगायची..? आई. का लोक दारू पिऊन ... चालवतात गं.?

Thursday, November 14, 2013

हृदयस्पर्शी कथा

कॉलेजमध्ये,कट्ट्यावर जिकडे पहावे तिकडे एकच नाव
होतं श्रुती आणि राम. असणारच ना कारण
त्या दोघांचं एकमेकांवर तेवढं
प्रेमही होतं.श्रुती दिसायला इतकी सुंदर
जणू
देवाच्या हातातील कलाकृतीचा एक
सुंदर
नमुना आणि राम म्हणजे दिसायला जेमतेम पण
क्षणार्धात मन जिंकून घेणारा त्यामुळे
त्यांची जोडी चांगलीच
जमली होती.
एके दिवशी दोघांनी मिळून
महाबळेश्वरला फिरायला जाण्याच
ठरवलं,ठरल्याप्रमाणे दोघही महाबळेश्वरला गेले
खूप-
खूप एन्जॉय केला आणि परत घराकडे
जाण्यासाठी बसस्थानकाकडे आले.
श्रुतीला तिथे
गरम-गरम भेटणारे खारे शेंगदाणे खूपच आवडत असत
म्हणून तिने रामकडे शेंगदाणे
आणण्यासाठी हट्ट
धरला मग रामनेही तिचा हट्ट पुरवला व
गाडी पुन्हा परतीचा प्रवास करू
लागली पण
श्रुती गाडीत
रामची जाणूनबुजून थट्टा करत
होती मग
अचानक ती म्हणाली "ए राम तू जर
शेंगदाणे
विकणारा असतास तर किती छान झालं असतं
रे,मी लगेच तुझ्याशी लग्न केलं
असतं "
रामही तिला हसून हसून प्रतिसाद देत
होता आणि हसता हसता प्रवास
कधी संपला दोघांनाही कळलच
नाही त्यानंतर बरेच
दिवस सुखात गेले,पण एक त्यादिवशी राम
जेव्हा कॉलेजला आला तेव्हा श्रुतीची एक
मैत्रीण
रामकडे एक चिट्ठी देऊन गेली,त्याने
ती चिट्ठी वाचली अन
त्याच्या काळजात चर्रर्र
झालं,डोक्यात मुंग्या आल्या ,त्याला अंगातून प्राण
गेल्यासारख वाटत होतं त्या चिट्ठीत
श्रुतीने लिहल
होतं कि 'सॉरी राम माझं लग्न ठरल
आहे,मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत
नाही कृपया माझा शोध घेऊ नकोस…
आणि खरच
तसच झाल होत
श्रुतीला तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे
लग्न
कराव लागलं होत आणि त्यांचं कुटुंब दूर कुठे
तरी निघून गेल होत.इकडे रामही ते
शहर सोडून कुठे
तरी निघून गेला होता...कुठे ? कुणालाच माहित
नव्हत…???
इकडे पाच वर्षात श्रुतीचा संसार आता चांगलाच
फुलला होता. त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस
महाबळेश्वरला साजरा करण्याचा तिच्या पतीने
ठरवलं
होतं,ठरल्याप्रमाणे सगळे महाबळेश्वरला गेले खूप
थाटामाटात वाढदिवस साजरा झाला अन मग सगळे
पुन्हा परत जाण्यासाठी निघाले पण तेवढ्यात
श्रुतीला तिचे आवडतीचे ते गरम
गरम खारे शेंगादाणे
खाण्याची इच्छा झाली म्हणून
गाडी बसस्थानकाकडे
नेण्यात आली.
गाडीमधून उतरून ती कुठे शेंगादाणे
विकणारा दिसतोय
का ते बघू लागली दूर एका कोपऱ्यात सायकलवर
आगेच ते धगधगत मडक घेऊन अतिशय कृश
झालेला दाढी वाढलेला एक माणूस शेंगदाणे
विकताना तिला दिसला ती धावत पळत त्याच्याकडे
गेली आणि त्याला दहा रुपयाची नोट
दिली आणि शेंगादाणे घेण्यासाठी हात
पुढे केला तर
अश्रूचा एक थेंब तिच्या तळहातावर पडला तिने वर
बघितलं तर तो शेंगदाणे
विकणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून
राम
होता तो …तिचा प्रियकर राम…तिला धक्काच
बसला होता, ती त्याला म्हणाली 'हे
अस कस
झालं ??' अश्रूचा एक अवंढा गिळत त्याने उत्तर
दिलं, की "श्रुती तूच
एकदा म्हंटली होतीस
ना की तू
शेंगदाणे विकणारा असतास तर
मी तुझ्याशी लगेच
लग्न केलं असत" सांग ना करणार
ना माझ्याशी लग्न….?? बघ
ना झालो ना मी आता शेंगादाणे
विकणारा आता तरी करणार
ना माझ्याशी लग्न…??तो अस म्हणताच
तिच्याही अश्रूंचा बांध तुटला पण स्वतःला सावरत
ती तशीच गाडीकडे
पळाली,गाडीत
बसली,अन
गाडी भरघाव निघून गेली.
अन तो तिथेच ती निघून गेलेल्या वाटेकडे
भरलेल्या डोळ्यांनी हातात शेंगादाणे घेऊन टक
लाऊन
बघत उभा होता.

Saturday, November 9, 2013

सोने आणि लोखंड

एक सोनार होता.
त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे
दुकान होते.
सोनार जेव्हा काम करत असे
तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज
होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे
तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने
मोठा आवाज होत असे.
तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके
दिवशी सोनाराच्या दुकानातील एक
सोन्याचा कण कसा कोण जाणे पण
लोहाराच्या दुकानात जावून पडला.
त्या सोन्याच्या कणाची भेट
एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप
दिवसांची ओळख असल्यासारखे ते
एकमेकांशी बोलू लागले.
सोन्याच्या कणाने
लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले
दुःख तर खरे एकसमान आहे.
दोघानाही आगीत तापवले जाते
आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर
बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे
काय?"
लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून
दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे
अगदी बरोबर आहे.
दोघानाही तापवणारी आग एकच आहे
आणि ठोकणारा हातोडाहि एकाच
धातूचा आहे.
पण खरे दुःख याचे आहे कि
तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच
लागत नाही पण
मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने
माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने
दिलेल्या दुःखापेक्षा "
स्वकीयांनी दिलेला त्रास
हा अगदी हृदयात वार करून जातो.....

Saturday, October 26, 2013

डोळे

एक मुलगी बस स्टँड ला बसुन रडत असते तिचं हे करुण रडणं ऐकून कामाला जायला निघालेला तरुण तिला विचारतो "तु का रडतेस ग"! त्यावर ती म्हणते "मला खुप भुक लागली आहे" म्हणुन त्याला तिची दया येते.
तो तिला खायला आणुन देऊन तो आपल्या मार्गी निघुन जातो..संध्याकाळी कामावरुनघरी येताना ती मुलगी त्याला तिथेच बसलेली दिसते. तिला जाऊन तो विचारतो,'काय ग तु अजुन ईथेच घरी का नाही गेली', त्यावर ती रडत रडत सागंते "माझं या जगात कोणी नाही आणि मी एक आंधळी मुलगी आहे." हे ऐकुन त्याचे ह्रदय गहीवरुन येते. तो तिला सांगतो कि "तुझी काही हरकत नसेल तर माझ्या सोबत चल",ती काही वेळ विचार करुन जायला तयार होतेँ.काही दिवसानी तो तिला तिच्या अंधत्वाचं कारण विचारतो आणि ती सांगते की "एका अपघातामधे मी माझेआईवडील गमावले मी वाचले पण आंधळी झाले" हे ऐकुन त्याला खुप वाईट वाटते कारण तो ही एक अनाथ असतो त्याचं तिच्यावर प्रेम जडते आणि एक दिवस तो तिला लग्नाची मागणी घालतो. काहि वेळासाठी ती स्तब्ध होते.. "मला हि आवडतोस पण.." बोलते "मला दृष्टी असती तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं, मग तो बोलतो "ठिक आहे तुला दिसायला लागल्या वर मी कसाही असलो तरी लग्न करशील ना" ती म्हणते "हो मी वचन देते" काही महिन्याने तो तिचं आँपरेशन मोठ्या दवाखान्यात करुन घेतो.आणि ती पुर्णपणे बरी होऊन तिच्या प्रियकराला बघते तेव्हा तिला धक्का बसतो कारण तो एक आंधळा असतो एका रात्री ती त्याला लग्नाला स्पष्ट नकार देते. त्यावर तो खुप दुःखी होतो,आणि सकाळ होताच तिच्या अंथरुणा शेजारी एकचिठ्ठी ठेऊन दुर निघुन जातो.जेव्हा ती चिठ्ठी ती वाचते तर ती ढसाढसा रडते त्यात फक्त एवढच लिहलं होतं..." I LOVE U...PLEASE TAKE CARE OF MY EYES.."..

Monday, October 14, 2013

देव घावला कणाकणांत?


दि. ५ जुलै २०१२ रोजी सकाळी हातात पडलेल्या पेपरची मुख्य बातमी होती ‘देव घावला कणाकणांत?’ -दै. सकाळ, ‘अखेर वैज्ञानिकांनी शोधला देव’ –दै, पुढारी, ‘कोई गॉड मिल गया’ –दै. नवभारत टाईम्स, ‘The God of all particles is here, almost’ –The Times of India,  ‘विश्वाचे रहस्य उलगडले? देवाचा अंश दिसला’ –दै. लोकमत
         सर्व बातम्यांचा मतितार्थ होता ‘वैज्ञानिकांनी शोधला देव.’ मनात प्रश्न पडला, असं असेल तर मग महान कोण? शोधलेला की शोधणारा ! अर्थात विचार केला तरच असले प्रश्न पडणार. स्वित्झर्लंड जवळील जिनिव्हा येथे सुरु असलेल्या महाप्रयोगातील शोधाची ५ जुलैची मुख्य बातमी ‘विश्वातील सर्वात लहान कणाचा अर्थात ‘हिग्ज बोसॉन’चा वैज्ञानिकांनी शोध लावला.’ अशी असायला हवी होती.परंतु अशा प्रकारचा मथळा असलेला एकही पेपर नव्हता हे विशेष. सदर बातमीला दैवी अथवा अध्यात्मिक बाज देण्याची अजिबात गरज नव्हती. परंतु सदर बातमीमुळे विज्ञान आणि अध्यात्म यांच्या श्रेष्ठत्वावरील रंगतदार चर्चेला उधाण आलं.
           ५ जुलै २०१२ अशा प्रकारे भरून यायला कारणीभूत होती दि. ४ जुलै २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र परिषद, मेलबोर्न येथे सर्न (CERN) मधील अॅटलस या विभागाच्या प्रमुख फॅबिओला जियानोत्ती (Fabiola Gianotti) यांनी वैज्ञानिक शोधाची केलेली अधिकृत घोषणा “We observe in our data clear signs of a new particle, at the level of 5 sigma, in the mass rigion around 126 GeV. The outstanding performance of the LHC (Large Hadron Collider) and ATLAS (A Torodial LHC Apparatus) and the huge efforts of many people have brought us to this exciting stage. A little more time is needed to finalize these results, and more data and more study will be needed to determine the new particle’s properties. The search is more advanced today than we imagined possible. The Higs Boson is an unstable particle, living for only the tiniest fraction of a second before decaying into other prticles.”
          याचा मराठी अनुवाद होतो, ‘आम्हाला जी वैज्ञानिक माहिती मिळाली आहे त्यावरून १२६ गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा असलेल्या व ५ सिग्मा पर्यंत सांखिकीय पुरावा असलेल्या कणांचा शोध आम्हाला लागलेला आहे. हा महत्वाचा शोध लावण्यात अनेकांच्या प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा कारणीभूत आहे. ही माहिती परिपूर्ण करण्यासाठी व या कणांचे गुणधर्म शोधण्यासाठी आम्हाला आणखी कालावधी लागेल. हा शोध हा पूर्वीपेक्षा अत्यंत आधुनिक आहे. हिग्ज बोसॉन कण हे अस्थिर आहेत आणि अतिशय कमी कालावधीमध्ये दुसऱ्या कणांमध्ये रुपांतरीत होतात.’
             जिनिव्हा येथे सुरु असलेल्या महाप्रयोगातून विश्वातील लहानात लहान कण ज्यांना हिग्ज बोसॉन कण असे संबोधतात त्यांचे अस्तित्व वैज्ञानिकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले हा या शोधाचा मतितार्थ होता. पीटर हिग्ज व भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी गणिती प्रणालीतून मांडलेला सिद्धांत प्रयोगाद्वारे सिद्ध झाला होता. भारतीयांचा ऊर वैज्ञानिक अंगाने भरून येण्याची गरज होती. न की दैवी अंगाने.
फॅबिओला जियानोत्ती यांनी केलेल्या घोषणेमध्ये कोठेही ‘God Particle’ अथवा ‘देव कण’ असा शब्दप्रयोग नाही. तरीसुद्धा प्रसारमाध्यमांनी या शोधाचं रुपांतर देव कणामध्ये करून वैज्ञानिकांच्या प्रयत्नाला व शोधाला देवापुढे कमी लेखण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक माहिती धार्मिक किंवा दैवी शक्तीशी जोडली की मगच सर्वसामान्यजन उत्सुकतेपोटी वाचणार आणि मग आपल्या बातमीचं मूल्य वधारणार हे पत्रकारांपेक्षा इतरांना कसं समजणार?
           वैज्ञानिक God Particle हा शब्दप्रयोग करत नाहीत तर वैज्ञानिक संकुलाव्यतिरीक्तचे लोक हा शब्दप्रयोग करतात. God Particle हा शब्दप्रयोग आला कसा हे जाणून घेणं मनोरंजक ठरेल. अमेरिकन वैज्ञानिक व सन १९८८ चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त लिऑन लिडरमन हे मुलभूत कणांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. म्युऑन न्युट्रीनो या मुलभूत कणांच्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांनी मुलभूत कणांच्यावरचे एक पुस्तक ‘God damn Particle’ या नावाने प्रकाशनासाठी प्रकाशकाकडे दिले. परंतु प्रकाशकाला आर्थिक व पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी ते नाव योग्य वाटले नाही. प्रसिद्धीसाठी यापेक्षा वेगळे नाव गरजेचे आहे या अनुषंगाने त्याने ‘God Particle: If the Universe is the Answer, What Is the Question?’ असे नामाधिनाम केले. विश्वातील लहान कणांना म्हणजे हिग्ज बोसॉन कणांना गॉड कण म्हणून संबोधणे हिग्ज सहित अनेक अनेक वैज्ञानिकांना आवडलेले नव्हते. सदर टोपणनाव धार्मिक लोकांच्या भावना दुखावल्यासारखे होईल असे हिग्ज यांचे मत होते. परंतु प्रसिद्धीसाठी प्रकाशकाने वैज्ञानिकांच्या मताला केराची टोपली दाखवली. आणि ‘God Particle: If the Universe is the Answer, What Is the Question?’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले आणि देव कण अर्थात ‘God Particle’ हा शब्द रूढ केला. प्रकाशकाला जे साध्य करायचे होते ते त्याने निर्विवादपणे साध्य केले. परंतु वैज्ञानिक अशा प्रकारच्या बाष्फळ चर्चेत गुंतून न पडता आपला संशोधनाचा वसा पुढे चालवतो आणि युवा पिढीला नाविन्याची, आधुनिकतेची आणि प्रगल्भ होण्याची कास धरण्यास प्रवृत्त करत असतो.
- डॉ. नितीन शिंदे यांच्या लेखातून

Sunday, September 8, 2013

अपराजित दाभोलकर

अपराजित दाभोलकर
20 ऑगस्ट 2013 ,रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, फुटपाथच्या कडेला, 
पण,
अंधाराच्या सनातनी दुतांनो, मी तुरूंगातून बघतोय तुमच्या पराभवाची नांदी
दाभोलकरांच्या प्रतिमेवर फुली मारून, तुम्हाला करायची होती
दाभोलकरांची इतकी जीवघेणी घृणा
तर खुशाल करायची होती मूठ मारून भानामती,
आणि टाकायची होती मुरगाळून एखादी कोंबडी,
दाभोलकरांच्या नावानं, 108 भटजींचा कळप घेऊन, रचायचा होता एखादा महायज्ञ
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या दारात
दाभोलकरांच्या वैज्ञानिक दृष्टीला भस्मसात करण्यासाठी
करायची होती करणी अंनिसवर, मांत्रिकाकडून घ्यायचा होता अंगारा धुपारा
आणि जादुटोण्यानं करायचा होता आळाबांधा
दाभोलकरांच्या विवेकवादी विचारांचा...........
एखाद्या चमत्कारी बुवाकडून,एखाद्या अवतारी माताकडून,एखाद्या गुरूमहाराजाकडून,
द्यायचा होता कठोर शाप, दाभोलकरांच्या सत्यानाशासाठी...
धारेचा लिंबू अर्धवट कापून,टाकायचा होता बिबव्याचा उतारा,
दाभोलकरांच्या वाटेवर,त्यांच्या नेत्रात फुल पाडण्यासाठी,त्यांची वाचा बंद करण्यासाठी...
श्रध्देने लटकावयाची होती काळी बाहुली,तुमच्या शाखेच्या बाहेर
आणि आरपार खुपसायच्या होत्या सुया,बाहुलीच्या अंगभर,दाभोलकर समजून...
हात जोडून,डोळे झाकून करायचा होता नवस,
एखाद्या कोट्याधिश देवस्थानाला
पावलापावलावर उभे करायचे होते मठाश्रम,
गावागावात,वस्तीवस्तीत भरवायचे होते सतसंग,
आणि खुशाल करायचे होते, दाभोलकरांना पाखंडी सैतान म्हणून घोषित...
आमची ना नव्हतीच कधी
आज मात्र तुमचं कावरंबावरं थोबाड, ओरडून ओरडून सांगतय
तुम्ही हे सारं करून थकला, मणक्याचं टिचं भरल्यागत वाकला
पण यातली कोणतीच मात्रा दाभोलकरांवर लागू होईना
काही केल्या दाभोलकरांचं बंड तुम्हाला रोखता येईना.......
दाभोलकर ऊन,पाऊस वारा पीत,ओठी घेऊऩ समतेचं गीत,
प्रत्येकाच्या डेक्यातला अंधार झाडत,मस्तकातले धर्मांध किडे काढत,अंधश्रध्देची भुते गाडत..
अहोरात्र चालत राहिले, काळोखाच्या साम्राज्यात उजेड पेरत
मसणवट्यापासून भोंदूच्या मठापर्यंत,एक गांव एक पाणवठ्यापासून
जातपंचायतीच्या उच्चाटनापर्यंत, दाभोलकर अखंड लढत राहिले, ......पण....
अंधारातल्या सनातनी दुतांनो
तुमच्या बुवाबाजीला, तुमच्या कावेबाजीला,
तुमच्या मांत्रिकाला ,तुमच्या तांत्रिकाला, तुमच्या सुईला, तुमच्या बिब्याला,
तुमच्या ज्योतिषाला,तुमच्या पंचांगाला,तुमच्या अंगा-याला,तुमच्या धुपा-याला,
तुमच्या अधर्माला,तुमच्या कुकर्माला
क्षणभरही विचलीत करता आलं नाही, दाभोलकरांच्या विजिगिषू ध्येयवादाला,
तुमच्या तथाकथित अध्यात्मिक शक्तिने कणभरही मारता आलं नाही
नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला, अंतिमत: ....
पराभूत होऊन तुम्हाला टेकावे लागले गुडघे,...दाभोलकरांसमोर...
म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं,
जे आज तुम्ही भिजवलय पुन्हा दाभोलकरांच्या रक्तात,
हा तुमच्या कुकर्माचा लेटेस्ट अध्याय, आणखी एक कलंकित कडी....
रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, 20 ऑगस्ट2013,फुटपाथच्या कडेला,....पण...
अंधाराच्या सनातनी दुतांनो, मी तुरूंगातून बघतोय तुमच्या पराभवाची नांदी....आणि
अपराजित दाभोलकर......
सचिन माळी(ऑर्थर रोड जेलमधून)

Saturday, September 7, 2013

गणपती

गणपती मुळचा कोण???
गणपतीच्या जन्मासंबंधी आणि एकुण
अस्तित्वासंबंधी काही प्रश्न-
जर शंकर देव होता तर
त्याला गणपतीचे शीर धडावेगळे
करण्याआधी हे कळाले
नाही का की हा आपला पुत्र आहे.
जर गणपती देव होता तर
त्याला कळाले
नाही का की ज्याला आपण अडवतोय
हा तर आपला बाप आहे.
शंकराला हे कसे माहित नव्हते
कि आपली पत्नी गरोदर आहे?
बरे जर पार्वतीने
गणपतीला मळापासुन बनवले होते तर
ती असे किती दिवस
बिना आंघोळीची राहीली कि ज्यामुळे
तिच्या शरिरावर इतका मळ
साचला होता?
गणपतीचे शिर धडावेगळे केल्यावर
त्याचे मुंडके जोडण्यासाठी हत्तीचे
मुंडके का घ्यावे लागले?
तेव्हा पार्वतीच्या मळाचा EFFECT
चालला नाही का?
जिवन-मृत्युचे शाप-उःशाप
देणर्या शंकराची शक्ती इथे कुठे
गेली होती?
कृतयुगात श्रीगणेशाचे वाहन सिंह
होते आणि त्याला दहा हात होते.
त्रेतायुगात त्याचे वाहन मोर
आणि सहा हात, द्वापारयुगात त्याचे
वाहन मूषक म्हणजे उंदीर आणि चार
हात होते जर प्रत्येक युगात
तो स्वतःचे हात स्वतः कमी-जास्त
करत होता तर जेव्हा त्याचे मुंडके
छाटले गेले तेव्हा त्याने ते स्वतःहुन
का नाही निर्माण केले?
म्हणजे स्वतःच्या मुलाचे प्राण
वाचवण्यासाठी शंकर-पार्वतीने
एका मुक्या प्राण्याचा जिव
घेतला का?
आणि अशा प्राणीहत्येतुन
जन्माला आलेल्या गणपतीला मंगलमु
सुखकर्ता म्हणावे तरी कसे?
शिव पुराणानुसार पर्वतीने
बनवलेल्या मळाच्या गोळ्यावर गंगेचे
पाणी पडले आणि गणपतीचा जन्म
झाला.
ब्रम्हवैवर्त पुराणात तर कहरच
आहे- पार्वती तो गोळा ब्रम्हदेवाकडे
घेऊन जाते आणि तो जिवंत
करण्याची विनंती करते, त्यावर
ब्रम्हदेव
आपल्या विर्याचा शिडकावा मारतात
आणि त्या गोळ्याचा गणपती होतो.
मग
गणपती शंकराचा की ब्रम्हदेवाचा?
गणपती विवाहित असून
ऋद्धी आणि सिद्धी या ब्रम्हदेवाच्य
बायका आहेत म्हणजे
ब्रम्हदेवाच्या विर्यापासुन जन्म
घेतल्यावर सुद्धा गणपतीने
आपल्याच बहिंनींसोबत कसे काय
लग्न केले?
सौगंधीका परिनया या संगित
सुत्राच्या तिसर्या अध्यायात तर
गणपतीचा उल्लेख काम-
वासनेचा असुरांमधला सहावा असुर
असा आहे.
मग अशा ना धड माणुस ना धड
जनावर अशा चित्र-विचीत्र
CHARACTER ला देव म्हणावे
आणि मानावे तरी कसे?
शैलेश कुंटे यांच्या पोष्ट वरून copied

Wednesday, August 28, 2013

रेप

जगन रेप कर.
असं जगनला कुणी सांगत नाही.
जगन आपणहूनच रेप करतो.
शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला, फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत.
त्यातले सगळेच रेप करू शकतात.
जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.
पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो.
आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो.
जगन वाईट आहे. भयानक वाईट.

पण वाईट जगनपैकी एकाची एक केस आहे.

या केसमधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं.
कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर.
इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही.
कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा.
कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते.
पण जगनला इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही.
कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं.
बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं.
पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं.
बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं.
आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात. मल्लिका, मुन्नी, शीला वगैरे सगळया.
शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो.
कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल.
आणि कॅमेऱ्याच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील.
असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे.
पण ते असो.
चूक जगनची आहे.

जगनही मग हस्तमैथुन करतो.
ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं.
बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला.
पण मार खाऊन इरेक्शन थांबत नाही.
म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोगचित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो.
आणि हस्तमैथुन करतो.

आपली परंपरा फार थोर आहे.
तिचा विजय असो.
आपल्या परंपरेनं शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट.
त्यामुळे लग्नापर्यंत थांबून नंतर सगळी कसर भरून काढली तरी चालेल.
म्हणजे पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तर चालेल.
पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे.
त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो.
शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं.
कारण त्या जगनला बिघडवतात.
पण जगनला त्या आवडतात.
कारण ज्याच्यामुळे इरेक्शनपासून सुटका मिळते ते जगनला चांगलं वाटतं.

पण इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही.
जगनला आता 'बाई' हवीच असते.
तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो.
आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो.
जगनचं जनावर होतं.

दुर्दैवाने जगन पुरूष आहे.
संस्कृती प्रगत झाली तरी संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही.
शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं.
पुरूषसत्ताकतेचं.
म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख.
आई त्यानंतर.
जगन, तू मुलगा आहेस.
मुलींसारखा रडतोस काय?
जगन, तू मुलांच्यात बस बघू.
मुलींबरोबर कसला बसतोस?
जगन, मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात.
क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी.
जगन, स्वयंपाक तू नाही करायचास.
पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे.
जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं.
त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं.
जगन, तू मर्द आहेस.
बाईला जिंकणं यात मर्दानगी असते.
वगैरे.

आधीच इरेक्शन आणि त्यात पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन.

जगन पार बिघडून गेलाय.
त्याच्यातला हिंस्त्रपणा जनारांनी लाजावं इतका वाढलाय.

कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो.
त्याला फाशी द्यावी असं वाटतं.
जगनला फाशी जरूरच द्यावी.
त्याने जगन नक्की मरेल.
पण नर उरेल.

कारण नर आणि मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत.

नर पुन्हा हस्तमैथुन करत वाढेल आणि पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन त्याला दिलं जाईल.

आणि मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील.
शुभंकर संभोगाची.

- उत्पल

Sunday, August 18, 2013

टाळ्या वाजवणारे मृतात्मे: अमेरिकन बहिणींची बुवाबाजी



जगाच्या पाठीवर सर्वत्र मृतात्म्यांच्या अस्तित्वाला विविध धर्मांत मान्यता आहे. हे आत्मे विविध रुपात भटकत असतात असा समज आहे. विज्ञानात आत्म्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. तरीही एका मानसिक गरजेपोटी माणूस आपल्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाला सहन करत नाही व त्याला आपल्या प्रिय व्यक्तीच्या तथाकथित आत्म्याशी संवाद साधण्याची अनिवार ओढ लागलेली असते. या मानसिकतेचा फायदा घेऊन नसलेल्या आत्म्याशी संवाद साधून देणारे दलाल जागोजागी जगभर दिसतात. अमेरिकाही याला अपवाद नाही. १९४८ मध्ये न्यूयॉर्कमधून आत्म्याशी संवाद साधण्याची बुवाबाजी दोन चलाख भगिनींनी सुरु केली. या बुवाबाजीचा पर्दाफाश कसा झाला हे जाणून घेणे जितके मनोरंजक तितकेच प्रबोधन करणारे ठरेल.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील हाईड्सव्हिले हे एक उपनगर. जॉन फॉक्स नावाच्या लोहाराचे कुटुंब येथे राहत होते. या कुटुंबात एकूण पाच सभासद होते. जॉन फॉक्स, त्याची पत्नी व मार्गारेट(मॅगी), कॅथेरीन (कॅथी) आणि ली फिश या त्यांच्या मुली.
मार्गारेट आठ वर्षांची व कॅथेरीन साडे सहा वर्षांची असतानाची ही घटना. या दोघी बहिणी मोठ्या खोडकर होत्या. त्यांची आई मात्र प्रेमळ व सरळ मनाची पण भित्र्या स्वभावाची होती. या स्वभावाचा फायदा घेऊन या खोडकर पोरी आईला घाबरवण्याचे विविध उद्योग करीत असत. बेडवर झोपायला जाताना दोघी बहिणी एक सफरचंद दोरीला बांधून ती दोरी वरून खाली जमिनीवर टाकून आपटल्याचा आवाज काढीत. आईने हा आवाज बऱ्याचदा ऐकला पण तिला आवाज कशामुळे येतोय हे कळायचे नाही. कॅथी व मॅगी तशा लहानच. त्यामुळे त्या हा चावटपणा करत असतील अशी पुसट शंकाही तिला आली नाही.
अखेरीस तिने हा गूढ प्रकार आपल्या शेजाऱ्यांना सांगायला सुरुवात केली. आपली आई व शेजारी या गूढ आवाजावर विश्वास ठेवतात हे लक्षात येताच दोघी बहिणींनी पायाची बोटे लाकडी जमिनीवर खुबीने वाकवून वेगळेच आवाज काढायची नाटके सुरु केली.
हे आवाज आपण कसे काढीत असू हे पुढे मॅगीने उघड केले. तिने दिलेला कबुली जबाब असा, “माझी बहीण कॅटी हिला हाताची बोटे मोडण्यातून आवाज निघतो हे माहित होते. तसाच आवाज पायाची बोटे जमिनीवर मोडून काढता येईल हे तिच्या लक्षात आले. मग आम्ही दोघींनी एका पायाची बोटे वापरून असा आवाज काढण्याचा सराव केला. नंतर दोन्ही पायाच्या बोटाने असा आवाज काढण्याचा सराव केला आणि अंधारात असा बेमालूम आवाज काढण्याचे कौशल्य आम्ही प्राप्त केले.”
पायाची बोटे लाकडी जमिनीवर मोडून टाळीसारखा आवाज निघे. या आवाजाचा वापर करून या बहिणींनी न्यूयॉर्कमध्ये व नंतर सर्व अमेरिकेत एका नव्या बुवाबाजीची सुरुवात केली. अमेरिकेत मृतात्म्याशी संवाद करण्याचे दरबार या दोघींनी सुरु केले. १९४८ मध्ये या नाट्याला सुरुवात झाली.
मॅगी व कॅथी यांनी असा दावा करायला सुरुवात केली की आपल्या बेडरूममधून विचित्र आवाज येत आहेत. हे आवाज एका खून झालेल्या फेरीवाल्याच्या आत्म्याचे होत असे सांगायला त्यांनी सुरुवात केली. थोड्याच दिवसांनी या दोघींच्या आईला याबाबतची खात्री देणारा अनुभवच आला. हा अनुभव तिने स्वतःच्या सहीने प्रसिद्धीस दिला. ती वेळ होती ३१ मार्चच्या मध्यरात्रीनंतरची. म्हणजेच एप्रिल फूलचा दिवस. मॅगी व  कॅटीने सगळ्या अमेरिकेला एप्रिलफूल करण्याची ती सुरुवात होती. मॅगीच्या आईने हा अनुभव खालीलप्रमाणे वर्णन केला.
कॅटी मोठ्याने म्हणाली, “मि. स्प्लिटफूट (खुन्याचा आत्मा) मी जसं करते तसं तू कर.” मग तिने टाळ्या वाजवल्या. लगेच तेवढ्याच टाळ्या कुठूनतरी वाजल्या. मोठे गूढच झाले. नंतर मॅगी उद्गारली, “आता मी करते ते कर; मोज एक, दोन, तीन आणि चार.” तशा चार टाळ्या तिने वाजविल्या आणि आश्चर्य म्हणजे तशाच चार टाळ्या प्रतिसादादाखल वाजल्या.
नतंर फेरीवाल्याच्या आत्म्याने अशा प्रतिसादाद्वारे संदेश दिला की, त्याचा खून झालाय व त्याचे प्रेत तळघरात पुरलंय. पण याची शहानिशा करण्यासाठी ते तळघर खणल्यावर तेथे थोडी हाडेच सापडली. मात्र ही हाडे कोण्यातरी प्राण्याची असावीत माणसाची नव्हे असा निष्कर्ष निघाला.
काही दिवसातच लोकांपर्यंत बातम्या पोचल्या की, या मुली केवळ त्या फेरीवाल्याच्या आत्म्याची माहिती देत नाहीत तर अशा भटकणाऱ्या वा खितपत पडलेल्या अनेक आत्म्यांच्या शोधासाठी मदत करतात. त्यांनी केलेल्या प्रात्यक्षिकांची एवढी ख्याती झाली की, या मुलींची थोरली बहीण ली फिश हिने मृतात्मावादी सोसायटीची स्थापना घोषित केली. याच्या प्रसाराला धर्माचे स्वरूप आले. आणि मृतात्म्याच्या दरबारात सुरुवातीला व शेवटी धार्मिक प्रार्थना म्हणायला सुरुवात झाली.
न्यूयॉर्क शहरात उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर ली फिशने या दोघींना घेऊन संपूर्ण अमेरिकेतील विविध शहरामधून मृतात्म्याशी बोलण्याचे दरबार भरविण्याची मोहीम सुरु केली. प्रत्येक ठिकाणी लोक आपल्या प्रिय मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संवाद साधण्यास मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले.
या गोष्टीचा असा बोलबाला झाल्यावर अमेरिकेतील विवेकवादी मंडली जागी झाली. चिकित्सक संशोधकांनी मॅगी व कॅटीला आव्हान देण्यास सुरुवात केली. बफेलो विद्यापीठातील प्राध्यापकांनी या मुलींना मिळणारे आत्म्यांचे गूढ आवाज तपासले. संशोधनांती हे गूढ आवाज आत्म्याचे नसून या मुलींच्या सांध्यांतून मुद्दामहून काढलेले असावेत असा निष्कर्ष काढला. नंतरच्या संशोधनात असे आढळले की, हे आत्मे अनेकदा चुकीची उत्तरे देत आहेत. मॅगीच्या पायाची हालचाल नियंत्रित केल्यावर असे गूढ आवाज येत नाहीत असा निष्कर्ष त्यांनी काढला.
चलाख मंडळी आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप होऊन त्याची जाहीर कबुली सहसा देत नाहीत. आपण इतरांना फसवले हे कोण सांगेल? ते लपवून ठेवण्यातच शहाणपणा दाखविण्याची प्रवृत्ती बहुतेक मंडळींची असते. पण कॅटी आणि मॅगीच्या बाबतीत आश्चर्यकारक गोष्ट घडली. आम्ही लोकांना फसवीत होतो याची जाहीर कबुली त्यांनी दिली. पण ती चाळीस वर्षांनी. त्यांच्या दरबाराची सुरुवात झाली १९४८ मध्ये व जाहीर कबुली दिली २१ ऑक्टोबर १९८८ मध्ये. त्या दिवशी या भगिनी न्यूयॉर्कमधील संगीत अकादमीच्या हॉलमध्ये दाखल झाल्या. आम्ही चलाखीने मृतात्म्याचे आवाज कसे काढत होतो याचे प्रात्यक्षिक मार्गारेट दाखवू लागली आणि कॅथरीन मान डोलावून त्यास होकार देत होती. गंमत म्हणजे या कार्यक्रमास जमलेल्या मंडळीत आत्म्याचे अस्तित्व मानणारे बहुसंख्येने होते. त्यांना धक्काच बसला व ते भुवया उंचावून स्टेजवरील प्रात्याक्षिके खोटी आहेत असा नकारात्मक सूर काढू लागले व आपली नाराजी प्रकट करू लागले. मृतात्म्यांचे टाळीसारखे आवाज मार्गारेट पायातील बूट चलाखीने काढून, पायाची बोटे वाकवून कशी काढत होती ते स्पष्टपणे दाखवीत होती. मोजे घातलेला पाय पातळ अशा लाकडी फळीवर कौशल्याने आपटून ती आत्म्याचा गूढ अवाज काढत होती. आणि हे ती सर्वांसमोर दाखवीत होती.
इव्हनिंस पोस्ट या दैनिकाने दुसऱ्या दिवशी या प्रयोगावर बातमी दिली. “मिसेस मार्गारेट आता आधुनिक मृतात्मावादाचा उगम तिच्या पायाच्या अंगठ्यात असल्याचे दाखवीत आहे.” मार्गारेटने स्वतः याबाबत खालील निवेदन जाहीर केले.
“हीच वेळ आहे की, आता मला मृत्यूनंतरचे जग व एकूणच अध्यात्मवादाबाबतच्या या विषयाबाबतचे सत्य उघड करायला हवे. हा विषय आता जगभर पसरला आहे आणि याला वेळीच पायबंद घातला नाही तर त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. या क्षेत्रात मी प्रथम प्रवेश केला आणि म्हणून तो उघड करण्याचा हक्क मलाच आहे.”
पुढे मग लहानपणी आईच्या भित्र्या स्वभावाचा फायदा घेऊन तिच्या खोड्या कशा काढत असू हे मार्गारेटने विस्ताराने आपल्या निवेदनात कथन केले. ज्याची माहिती या लेखाच्या सुरवातीस आली आहे. या निवेदनात मार्गारेटने पुढे लिहिले आहे की,
तिची थोरली बहिण ली फिश हिला माहित होते की, मृतात्म्यांच्या टाळीचा आवाज हा बनावट होता आणि जेव्हा तिने दोघी बहिणीबरोबर अमेरिकेचा दौरा केला तेव्हा लोकांच्या प्रिय मृतात्म्यांच्या प्रश्नांची उत्तरे तीच त्यांना सुचवित असे. यासाठी ती दरबारात आलेल्या लोकांकडून अगोदरच माहिती मिळवीत असावी आणि अशी माहिती मिळत नसेल तेव्हा या क्षेत्रातील चाणाक्ष लोक संदिग्ध उत्तर देण्याचे जे कौशल्य वापरतात तेच त्या वापरत असाव्यात.
मार्गारेट आणि तिच्या बहिणींचे हे मृतात्मानाट्य आणखीनच वेगळ्या प्रकारे रंगत गेले. या भगिनींची अशी अटकळ होती की, आपल्या सत्य कथनाबद्दल लोक आपली स्तुती करतील व निर्भयपणाला दाद देतील. शेवटी माणूस पैशाचा गुलाम असतो हेच खरे. पूर्वी दरबारात चलाखी करून पैसा मिळे, पण आता खरे लोकांना सांगितले तर लोक खूश होऊन अधिक बक्षीस देतील अशी त्यांची अटकळ होती. पण घडले उलटेच. आपण मृतात्म्यांचा आवाज चलाखीने काढत होतो याचे प्रयोग त्यांनी लोकांसमोर सुरु केले. त्याला खुश होऊन लोक आर्थिक मदत करतील ही मार्गारेटची अपेक्षा फोल ठरली. चरितार्थ चालवणे त्यामुळे कठीण झाले. तिला जाणीव झाली की, लोक फसण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात पण शहाणे होण्यासाठी नाही करत.
परिणामी मार्गारेट परत आपल्या मूळ मृतात्मा संवाद दरबाराकडे वळली याचे आश्चर्य वाटायला नको. ८ मार्च १९९५ रोजी तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या शोकयात्रेसाठी हजारो अध्यात्मवादी (मृत्यूनंतर आत्मा असतो असे मानणारे) जमले होते व शोक व्यक्त करीत होते.
आजही मृतात्म्याच्या भेटीसाठी आसुसलेली ही मंडळी मार्गारेटने कबूल केलेला अपराध हा खोटा असल्याचे सांगतात. तिच्या पैशाच्या गरजेपोटी किंवा या क्षेत्रातील इतर स्पर्धकांवर सूड उगवण्यासाठी तिने हे ढोंग केले असावे असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि पुढे तिच्या बहिणीने, ती चलाखीच करत होती याला पुष्टी दिली आणि ही चलाखी त्या दोघी कशा करत होत्या याची प्रात्याक्षिके दाखवण्याचे कार्यक्रम परत परत केले.
मार्गारेट व तिच्या बहिणींचा अमेरिकेतील हा आत्म्याचा खेळ मानवी स्वभावाचे अनेक पैलू दाखवतो. माणसांना सत्य पचवणे किती जड जाते व सुप्त इच्छांच्या पूर्तीसाठी आभासी जग त्यांना खरं वाटू लागतं. या आभासी जगाचे दर्शन चलाख मंडळी करतात हे त्यांना हवहवसं वाटतं. आपली फसवणूक होत आहे हे दिसल्यावर देखील लोक ते मान्य करायला तयार होत नाहीत. म्हणूनच जेम्स रँडीनं म्हटलंय, “लोकांना फसण्याची भारी हौस असते. म्हणून त्यांना फसवणे सोपे जाते.”
विवेकाची वाट किती अवघड आहे नाही का?

-प्रा. प. रा. आर्डे

Monday, July 1, 2013

मराठी सिनेमातील गाणे

मराठी सिनेमातील हे गाणे बुवाबाजीचे स्वरूप उघड करते. जरूर पहा.

Monday, June 10, 2013

आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजी...

आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात.
आजचे बाबा हुशार आहेत, उच्चशिक्षितही आहेत. समाजमनाचा दांडगा अभ्यास त्यांनी केलेला असतो. मानसशास्त्रही ते कोळून प्यालेले असतात. समाजाची नाडी त्यांनी ओळखलेली असते. म्हणूनच त्यांच्या सत्संगांना हजारो लाखोँच्या संख्येने गर्दी होते.
देव, देवता, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, चौऱ्‍याऐंशीचा फेरा, आत्म्याचे अमरत्व, परमात्म्याशी तादात्म्य पावणे, कुंडलिनी जागृत करणे, मोक्षप्राप्ती अशा अवैज्ञानिक, बिनबुडाच्या संकल्पनांचा समाजाच्या अस्थिर मनावर भडीमार करीत हे बाबालोक आपणाला शरण आल्याशिवाय तरणोपाय नाही हे पटवून देण्यात यशस्वी ठरतात. अशा या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन सूज्ञ व्यक्तिदेखील स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी बाबांच्या चरणी गहाण ठेवतात हीच ती खरी अंधश्रद्धा. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, आता मंगळावर मोहीम चालू आहे आणि दुसरीकडे मी मी म्हणणारे सुशिक्षितसुद्धा मोक्षप्राप्तीच्या मृगजळामागे धावतांना दिसतात. हीच ती आधुनिक अंधश्रद्धा.
एकदा का बुवाचे अनुयायी झाले की आपल्याला सुख, समाधान, शांती मिळेल अशी शरणार्थी व्यक्तीची धारणा बनते. मग ती बाबाच्या बुवागिरीत पुरती अडकते, भरडली जाते. ती कशी? ते पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होईल-
बांबांच्या कंपूत किंवा कळपात फक्त शिरता येते बाहेर पडण्याचा विचार मुळापासूनच छाटला जातो.
बांबांच्या कृपादृष्टीशिवाय तरणोपाय नाही असे बिंबवले जाते.
जीवनातील दुःखे, चिंता, समस्या बाबांमुळे हमखास दूर होतील याची हमी हस्तकांकरवी दिली जाते.
आलेल्या संकटाचा किंवा अडचणीचा सामना आपण नाही तर खुद्द आपले बाबाच करतील असा विचार बळावून व्यक्ति निष्क्रिय बनते.
बांबांनी वेळोवेळी ठरवून दिलेले साधना साहित्य त्यांच्या भांडारातूनच खरेदी करण्याची अलिखित सक्ती असते.
जपमाळा, बाबांच्या प्रतिमा, फोटो, नेमून दिलेले ग्रंथ-पोथ्या, बाबांच्या गौरवार्थ त्यांच्याच मठातून प्रकाशित होणारी मासिके, विशेषांक, कॅसेटस्, सीडीज, भिंतीवरची कॅलेंडर्स, बाबांची छबी असलेल्या अंगठ्या, ताईत, पदके, गळ्यातल्या माळा, वह्या,पेन इ.इ. भक्ताच्या माथी मारले जाते. ते साहित्य खरिदण्याशिवाय पर्याय नसतो.
बांबांचा जाहीर कार्यक्रम वा सत्संग वा दर्शन सोहळा जेथे असेल त्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावेच लागते.
अमूक रोगावर तमूक औषध म्हणून भांडारातून दिल्या जाणाऱ्‍या गोळ्या भलेही शेणा-मातीच्या असल्या तरी भक्त बाबांचे नाव घेऊन सेवन करतांना आढळतो.
बाबा म्हणतील ती पूर्वदिशा असते. का? कसे? असले फालतू प्रश्न विचारून त्यांना गोत्यात आणणाऱ्‍या भक्ताला जागीच ताकीद देण्याची तजवीज बांबांचे हस्तक करीत असतात.
सर्व भिस्त बाबांवर सोपवून निवांतपणे अध्यात्माच्या नावाखाली बाबांची व्यक्तिपूजा करण्याची सवय लागल्याने व्यक्ती वैचारिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या पंगु बनविली जाते.
बाबांचा अनुग्रह नामांकित व्यक्तींनी (उदा. नेते, अभिनेते, खेळाडू इ.) घ्यावा असे जाळे हस्तकांमार्फत पसरवले जाते. बाबांचे चरणस्पर्श करा तुम्हांला अपयश येणार नाही असे त्या वलयांकितांना पटवून दिले जाते आणि एकदा का अशी व्यkti बाबांकडे आली की प्रसारमाध्यमांना हाताशी धरून त्या बातमीचा उपयोग बाबांची प्रसिद्धी करण्यासाठीच केला जातो. बाबांकडे नक्कीच काहीतरी अद्भूत शक्ति असल्याशिवाय ती व्यक्ती अनुग्रह घेणार नाही अशी समाजमनाची ठाम समजूत होते आणि बाबांचा कळप वाढीस लागतो.
काही व्यक्तींच्या अगतिकतेचा, असहायतेचा गैरफायदा बुवाबाबांकडून घेतला जाऊन प्रसंगी संमोहन विद्या वापरून तिचा शारीरिक उपभोगसुद्धा घेतला जातो. बाबांना ईश्वरतुल्य मानले जात असल्याने अशी प्रकरणे मठाच्या शयनगृहातच दडपली जातात. फार क्वचितवेळा बाहेर पडणाऱ्‍या भानगडी म्हणजे हिमनगाचे टोक असते.
अशा अनेक प्रकाराने ही बाबागिरी,बुवाबाजी सामान्यजनांची लूट ठरते...
बाबांच्या भजनी लागले जाण्याची कारणे कोणती?
बहुदा ती मानसिक असतात. धावपळीच्या संघर्षमय जगात टिकून राहण्याचा तणाव प्रत्येकाच्या मनावर असतो. त्यातून उद्भवणाऱ्‍या चिंता, काळज्या, विवंचना ह्या मनोकायिक आजारांचे रूप घेऊन येतात. कितीही तपासण्या केल्या तरी शारीरिक आजार सापडत नाही. अशावेळी समुपदेशनाची गरज असते परंतु चांगले सांगणारा गोड बोलणारा कोणी भेटत नाही. पैशालाच सर्वस्व मानणाऱ्‍या या दुनियेत हितचिंतक, मित्र, स्नेही, नातलग भेटतील म्हणता भेटत नाहीत. त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेमुळे म्हणा किंवा पैशापाठी धावून थकल्यामुळे म्हणा जोडीदारांमध्येही फारसा सुसंवाद होत नाही. परिणामी ताण तणाव वाढतात. मग व्यक्ति मनःशांतीच्या शोधात बाबांपर्यंत येऊन ठेपते. बाबांची अतिसमाधानी मुद्रा, तेजःपुंज चर्या, डोळ्यातील सुखाची शीतल चमक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विदीर्ण मनाच्या व्यक्तीला बाबांची ओढ लागते. बाबांचे मोहमयी दर्शन म्हणजे दुखऱ्‍या व्रणांवरचा लेप वाटतो. त्यांची मिठास वाणी व मधुर संभाषणाची नशा हवीहवीशी वाटू लागते आणि क्षणार्धात व्यक्ती बाबांची भक्त होते.
दडपणाखाली वावरणाऱ्‍या, न्यूनगंड असलेल्या किंवा पारतंत्र्य सोसणाऱ्‍या व्यक्तींना बाबांच्या सत्संग, प्रवचनांना जाणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे किंवा स्वतःला सिद्ध करून दाखवणे अशा प्रकारातले असते.
काहीजण खून, दरोडे, चोऱ्‍या, भ्रष्टाचार, व्यभिचार आदी पापांचे क्षालन बाबांच्या माध्यमातून होईल अशा हेतूने बाबांच्या भजनी लागतात.
या बुवाबाजीच्या अंधश्रद्धेला लगाम घालण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे, हरेक घटनेच्या मुळाचा चौकस नजरेने शोध घेणे, स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे यासारखे उपाय अंगिकारता येतील.
- डॉ.श्रीराम दिवटे

Saturday, June 1, 2013

भुताचे दर्शन

10 वीत असतानाचा हा किस्सा . त्यावेळी "झलक दिखलाजा " हे गाण खूप famous झाल होत .
एके दिवशी मी 'आज तक ' news channel वर पाहिलं होत की  "गुजरात मध्ये एक गाव आहे . त्या गावात झलक दिखलाजा song लावलं का भूत येतात."
...
हे ऐकून मी एक plan बनवला. रात्री स्मशानात बसून जागायचं आणि ते गाण म्हणायचं  "झलक दिखला जा .
मी मनाशीच म्हंटल "बघू तरी कशी भूत येतात ????
मी हा plan माझा एक खास मित्र 'अभी' ला सांगितला. तो plan ऐकून यायला तयार झाला .
दिवसांनी अमावस्या होती त्याच दिवशी जायचं ठरलं ……
ठरल्या दिवशी मी घरी सांगितल की "मी अभी कडे झोपायला चाललोय …. "  अभी ने त्याच्या घरी सांगितल की मि "हसीम कडे झोपायला जातोय … "
बरोबर १०:३० वाजता आम्ही भेटलो आणि चालत चालत स्मशानाकडे निघालो . आम्ही खुप आतुर झालो होतो . जाताना मला रस्त्याच्या बाजूला एक oil paint चा डब्बा दिसला .
मी तो डब्बा स्मशानात वाजवायला घेतला . music पण हव ना गाण्या बरोबर म्हणून ….
स्मशानात पोहोचलो. स्मशानामध्ये एक पत्रा टाकून बनवलेली शेड होती …. त्या मध्ये एक कट्टा होता जिथे मेलेल्या माणसाला जाळतात …… आम्ही त्यावर जाऊन बसलो ...
अभी ने तो oil paint चा डब्बा वाजवायला सुरवात केली , मग मी पण हिमेश प्रमाणे ' oooooouuuuuu huujooooorrrrrr ­rrr ' पासून सुरवात केली .
मग आम्ही दोघ मिळून ओरडायला लागलो "झलकदिखलाजा ,झलक दिखलाजा , एक बर आजा आजा sssssssss जाsss "
तेवढ्यात जवळच्या एका झुडूपामधुन एक बाई किंकाळत किंकाळत बाहेर आली . आणि तशीच किंकाळी फोडत शिंदे वस्ती कडे पाळली …….
अंधार असल्यामुळे आम्हाला काही स्पष्ट नाही दिसलं . पण हे बघून आम्ही दोघे चांगलेच घाबरलो . तो डबडा दिला टाकून आणि लागलो दोघ पाळायला . पळत - पळतच गावात परत आलो . आणि सरळ मारुती मंदिरात घुसलो .
अभी बोलायला लागला "बघ होतं कि नाही भूत.. बघ होतं कि नाही भूत ???".
माझी तर चांगलीच फाटली होती . मी तर काही बोलायच्याहि शुद्धीत नव्हतो .
परत कधी भुत पहायचं नाही असं  ठरवून आम्ही मारुतीच्या मंदिरातच झोपलो .
सकाळी उठून घरी आलो . घरी कोणाला काहीही माहित नव्हतं . आम्ही दोघांनीही आमच्या घरी काही एक सांगितल नाही .
- दिवसांनी शिंदे वस्तीतल्या काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला सांगू लागल्या
"
तेरे को काय सांगू हसीम की आई ……
परवा रात को मै toilet के लिये स्मशान के पास गयी . तब दोन भूत वहा डबडा बजा रहे थे और गा रहे थे 'एक बार आजा आजा आजा '. मै कसल्या घाबरी क्या सांगू तेरेको अब ???
मै तो बाई तिथच चिम्पाट फ़ेकके भागी ना….

-इंटरनेटवरून साभार