Sunday, October 16, 2022

बुवाबाजी विरोधाची वैचारिक कारणे

 बुवाबाजी विरोधाची वैचारिक कारणे

-श्री. कुमार मंडपे

     काही बाबा हवेत हात फिरवून सोन्याची साखळी काढतात, हिन्याची अंगठी काढतात, तर काही इलेक्ट्रॉनिक्सची घड्याळे, मूर्ती काढून आपल्या भक्तांना त्यांच्या लायकी प्रमाणे अर्पण करतात. इतक्या प्रचंड प्रमाणात सोने, हिरे निर्माण करणारे असंख्य बाबा, महाराज, स्वामी, भगवान, आपल्या देशात असतानाही आमच्या अर्थमंत्र्यांना हातात कटोरा घेऊन आर्थिक मदतीसाठी देशोदेशी फिरावे लागते आहे. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना कोणताही बाबा देशाच्या मदतीसाठी धावून आला नाही. कोणत्याही बाबाने सोन्याचा डोंगर निर्माण केला नाही, की एखाद्या नदीत किंवा समुद्रात हात घालून पाण्याचे पेट्रोल तयार केले नाही. हातचलाखीने हवेतून विभूती, रुद्राक्ष काढून देऊन चमत्काराचा दबदबा निर्माण करता येतो. लोकांना नादी लावून प्रचंड पैसा कमविता येतो. म्हणून या बाबांना देशाचे दारिद्रय नाहीसे करता येत नाही.

     एखाद्या बाबाने कोरड्या विहिरीला पाणी लावून दिल्याचे सांगितले जाते. नदीतून जाताना नदी दुभंगते व बाबांना पैलतीरी जाण्यासाठी वाट दिली जाते. इतकी प्रचंड दैवी शक्ती त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. पण अशा बाबांना दरवर्षी होणारा महापूरांचा प्रलय थांबविता आला नाही किंवा सतत दुष्काळग्रस्त असलेल्या भागात पाऊस पाडता आला नाही.

     काही बाबा, महाराज, करणी करण्यात, मूठ मारण्यात तरबेज असल्याचे सांगितले जाते, घराघरातून, गावागावातून असे प्रकार केल्याचे भासवून घरातील शांतता नाहीशी केली आहे. आणि गावागावातून भांडणे निर्माण केली आहेत. अशा बुवांनी मूठ मारून पाकिस्तानी आक्रमकांना जमीनदोस्त केल्याचे ऐकण्यात नाही. काश्मिर, पंजाबात होणारे निरपराध लोकांचे शिरकाण थांबविता आले नाही. अहो कसे थांबविता येणार! कारण तशी अतिंद्रिय शक्ती कोणाकडेही नसते.

     बुवा हे तुमच्या आमच्या सारखे सामान्य असतात. त्यांच्या अंगावर असणारी कफनी सुद्धा त्यांना शून्यातून निर्माण करता येत नाही. एखाद्या गोष्टीची निर्मिती करण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. कायिक रासायनिक बदल घडून यावे लागतात. तेव्हा एखादा पदार्थ तयार होतो. नुसता हवेत हात फिरविला आणि वस्तू तयार केली असे घडत नाही. ही शुद्ध बनवाबनवी आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

     कोणत्याही बुवा महाराजांनी, समाजासाठी काहीही केले नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ साधून समाजाचे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण केले आहे. सामाजिक विषमतेच्या विषवल्लीला खतपाणी घालून पोसले आहे. मठ, आश्रम बांधून अनैतिक कार्ये मोठ्या प्रमाणात केली आहेत. समाजात दैववादाच्या जंतूंचा प्रसार केला आहे. आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

     थोडक्यात आपल्या जवळ जे नाही ते आहे असे भासविणारा, तो बुवा अध्यात्मिक वा पारलौकिक क्षेत्राशी स्वतःला जोडून दैनंदिन जीवनात दिशाभूल वा शोषण करणारा तो बुवा आणि श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार म्हणजे बुवाबाजी होय.

     मग लोक बुवाकडे का जातात? हा प्रश्न निर्माण होतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रश्न निर्माण होतात. हुंड्याच्या बाजारामुळे मुलीचे लग्न ठरण्यात अडचणी येतात. इच्छा असूनही घरात अपत्य खेळत नाही. मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही. नवरा नांदवत नाही. नवऱ्याची दारू सुटत नाही. घरातील व्यक्तीला असाध्य रोग झाला आहे. अशा नानाविध अडचणींमुळे व्यक्ती अगतिक बनते, आणि बुवाला शरण जाते. भारतीय संस्कृतीत अवतार कल्पना प्रत्येकाच्या मनात घर करून असते. परमेश्वराचा अवतार असलेला बुवा आपणास मार्गदर्शन करेल. संकटात मदत करेल अशा वेड्या आशेने लोक बुवाकडे जातात आणि कायमचे जायबंदी होतात.

बाबांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. इंग्लिश, हिंदीवर प्रभुत्व असते. त्यांच्याकडे संभाषणचातुर्य असते. याउलट काही बाबा ठार पागल असतात. स्वतःच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव

नसते. त्यांच्या भोवती असणारे धूर्त भक्त या स्थितीचा हुशारीने उपयोग करून घेतात. बाबांच्या चमत्कारांच्या पद्धतशीर कंड्या पिकवितात. प्रसारमाध्यमांचा पद्धतशीर उपयोग करून घेतात. बाबांच्यासाठी मठ, समाध्या, देवळे बांधतात. बाबांचे महत्व वाढवून अर्थार्जन करतात. 

     बुवाबाजीची तंत्रे ठरलेली असतात. बाबांच्या सामर्थ्याचा कणखर पाया म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत होय. जरी बाबांचे भाकित चुकले तरी या सिद्धांताची मदत बाबांना घेता येते. गेल्या जन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणजे हा जन्म होय व म्हणून या जन्मात कितीही चांगले वागले तरी गेल्या जन्मीचे फळ या जन्मात भोगून संपवावे लागते व या जन्मातील कर्मानुसार पुढचा जन्म मिळतो. म्हणजे बाबांचे भाकित चुकले नसून पूर्व जन्मीचा भोग आहे असे भक्ताला पटविता येते. याला म्हणतात कर्मविपाकाचा सिद्धांत.

    बाबांच्या तंत्राचा दुसरा मुद्दा म्हणजे संभवतेच्या नियमाचा (law of probability) आधार होय. बाबा ज्या प्रश्नांची उत्तरे देतात ते सर्व प्रश्न द्विपर्यायी असतात. उदा. मी परीक्षेत पास होईन का? मला मुलगा होईल का? अशा प्रश्नांची उत्तरे होय, नाही स्वरूपाची असतात. त्यामुळे कोणतेही भाकित केले तरी ५० ते ६० टक्के भाकित बरोबर येतेच. मुलगा झाला तर हत्तीवरून साखर वाटत बैंड लावून मठात यायला सांगितले जाते. त्यामुळे बाबांची प्रसिद्धी मोठ्याप्रमाणात होते आणि मुलगी झाली तर? गेल्या जन्मीचे पाप म्हणून व्यक्ती घरी स्वस्थ बसून राहते. माणसाचा स्वभावच आहे की, एखाद्या गोष्टीत यश मिळाले तर गावभर सांगत सुटायचे आण अपयश आले तर तेरी भी चूप और मेरी भी चूप.

    बाबांच्या तंत्राचा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, अफवा पसरविण्याचा पद्धतशीर प्रयत्न होय. उदाहरणार्थ बाबांची थुंकी अंगाला चोळली असता महारोगी बरा होतो. बाबांच्या स्पर्शाने आंधळा बघू लागतो. पांगळा चालू लागतो, मुका बोलतो. पुरावा विचाराल तर हजार मैलावरील गाव सांगितले जाते. इतक्या दूरवरची चौकशी सामान्य माणसांना अशक्य असते.

     अशा बुवाबाजीला जर सुरूंग लावायचा असेल तर प्रत्येक गोष्ट पदर पसरून स्वीकारण्याचे सोडून दिल पाहिजे. उलट चमत्काराची चिकित्सा केली पाहिजे. सकस शिक्षणाची गंगोत्री प्रत्येकाच्या दाराशी नेली पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याचे शिक्षण प्राथमिक शाळेपासून मिळाले पाहिजे. प्रत्येक भारतीय मन शोधक व पुरुषार्थी बनविले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने प्रबोधन करून माणसाच्या मानसिकतेत बदल घडवून आणला पाहिजे.


=================================

Monday, April 25, 2022

यात आश्चर्य ते काय?

 यात आश्चर्य ते काय?......य.ना.वालावलकर

धर्म आणि समाजजीवन या संबंधीच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी प्यू(Pew) नावाचे एक चर्चामंडळ (फ़ोरम) अमेरिकेत आहे. या मंडळाने अमेरिकन नागरिकांच्या धर्मज्ञानासंबंधी एक सर्वेक्षण केले.

त्यांनी मुख्यत्वेकरून ख्रिश्चन धर्म आणि बायबल यांवर आधारित 32 प्रश्न काढले. ती प्रश्नावली 3400(तीन हजार चारशे) अमेरिकन नागरिकांना पाठविली. या प्रश्नावलीत अन्य प्रमुख धर्म आणि धर्मग्रंथ यांवरही काही प्रश्न होते.  शेवटी " मी धार्मिक/अज्ञेयवादी/निरीश्वरवादी आहे."  यांतील एक पर्याय उत्तरदात्याने निवडायचा होता.

आलेल्या उत्तरांच्या विश्लेषणावरून नि:संदिग्धपणे असे आढळले की : " ईश्वरवादी व्यक्तींच्या धर्मज्ञानापेक्षा निरीश्वरवाद्यांचे धर्म आणि धर्मग्रंथ यांसंबंधीचे ज्ञान लक्षणीय प्रमाणात अधिक असते."

"हा निष्कर्ष धक्कादायक आहे. विस्मयकारक आहे."अशी प्रतिक्रिया कांही अभ्यासकांनी व्यक्त केली.

.....खरे तर या निष्कर्षात आश्चर्यकारक ते काय? कारण:

1. धार्मिकता आणि अज्ञान यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.

2. धर्मातील अनेक तत्त्वांच्या सत्यतेसाठी कोणताही पुरावा नसतो. त्यांवर श्रद्धा ठेवण्याविना अन्य पर्याय नसतो. म्हणून धार्मिकांना श्रद्धाळू असावेच लागते. श्रद्धा ठेवली की चिकित्सक बुद्धी कुंठित होते.

3. बहुसंख्य धार्मिक व्यक्ती विचारवंत नसतात तर बहुसंख्य विचारवंत धार्मिक नसतात.

4. जागतिक लोकसंख्येत धार्मिकांचे प्रमाण 80% + आहे; तर नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांत नास्तिकांचे प्रमाण 93% आहे.

5.वरील सत्यविधान 4 वरून दिसते की नास्तिकांचा बुद्ध्यंक(IQ) हा धार्मिकांच्या बुद्ध्यंकाहून मोठा असतो. (हे विधान वर्गाविषयी आहे. एखाद्या व्यक्तिविषयी नाही.)

6.बहुसंख्य धार्मिकलोक रूढी, परंपरा, कर्मकांडे, सरमनात/ कथाकीर्तनात ऐकलेली मिथके/भाकडकथा, येशूने/देवाने , संतांनी केलेले तथाकथित चमत्कार इत्यादि गोष्टींनाच धर्म मानतात. अधिक विचार करत नाहीत. धर्मग्रंथ/तत्त्वज्ञान वाचत नाहीत. वाचले तर अर्थ समजून घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे धर्मज्ञान यथातथाच असते.

7.एका विचारवंताने म्हटले आहे:"पूर्वी आस्तिक होतो. पण नंतर मी धर्मग्रंठ अभ्यासले." हे पटण्यासारखे आहे. नास्तिकतेच्या प्रसारासाठी धर्मग्रंथ हे प्रभावी साधन ठरू शकते. हे ग्रंथ विचारपूर्वक अर्थ समजून वाचणार्‍या धार्मिकाचे परिवर्तन नास्तिकात होऊ शकते. त्यामुळे अनेक नास्तिकांना चांगल्यापैकी धर्मज्ञान असते. (हिंदूंच्या बहुतेक धार्मिकविधींचे मंत्र संस्कृत भाषेत असतात. तेव्हा अर्थ कळण्याचा प्रश्नच नसतो.)

वरील विवेचन लक्षात घेतले तर प्यू फोरमच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक वाटू नये.

**********************************