Sunday, April 29, 2018

मूर्तीत ताकद असते?

अवैज्ञानिक गोष्टीवर एकदा श्रद्धा बसली की ती जाणे दुरापास्तच. आपण मानतो ते खोटे आहे हे स्पष्ट दिसत असले तरी माणसाची अंधश्रद्धा ढळत नाही. याचे एक उदाहरण असे:
......गझनीच्या महमुदाने सोमनाथाची मूर्ती फोडली हे सर्वज्ञात आहे.त्याने जेव्हा ते मंदिर पाहिले तेव्हा तिथल्या वैभवाने तो चकित झाला.पुरुषभर उंचीच्या चांदीच्या समया, सोन्याने मढविलेल्या आणि हिरे माणकांनी सजविलेल्या सुंदर मूर्ती पाहून त्याचे डोळे फिरले. "ही सारी दौलत आम्ही लुटणार " असे त्याने तिथेच जाहीर केले. तेव्हा त्याठिकाणी असलेले भक्तगण हसले. ते म्हणाले, "हे जागृत देवस्थान आहे. सोमनाथाचा प्रभाव फार मोठा आहे. तो देवच तुला शासन करील."
......दुसर्‍या दिवशी शस्त्रसज्ज अशा पंचवीस तीस सैनिकांसह गझनी घोड्यावरून आला.ते नंग्या तलवारी परजीत मंदिरात घुसले. गझनीने स्वहस्ते मूर्ती फोडली. सैनिकांनी सर्व संपत्ती लुटली. तिथे असलेले भक्त आणि पुजारी केवळ बघत राहिले. देवाचा चमत्कार दिसेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. प्रतिकाराचा प्रश्नच नव्हता. देवाने काहीच प्रभाव दाखवला नाही. पण देवाच्या सामर्थ्याविषयी कोणाच्याही मनात शंका उत्पन्न झाली नाही. केवढी ही अढळ श्रद्धा! धन्य धन्य ते परम भक्त ! त्यांच्या वंशजांची संख्या आज फार मोठी आहे.
.......ही ऐतिहासिक घटना आहे. ती सत्य आहे. या घटनेवर तर्कशुद्ध विचार केला तर काय निष्कर्ष निघतो? सोमनाथाची मूर्ती फोडली तरी भंजकाला काहीच झाले नाही. ज्या शिवमूर्तीची वेदोक्त मंत्रोच्चारांनी प्राणप्रतिष्ठा झाली होती अशा देवाचा काहीच प्रभाव पडला नाही. त्या अर्थी देवाच्या मूर्तीत काही सामर्थ्य नसते. म्हणजे वरळीचा सिद्धिविनायक, ठिकठिकाणचे अष्ट विनायक, पुण्याचा दगडूशेट गणपती, तिरुपतीचा बालाजी या आणि इतर सगळ्या मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुल्या आहेत. त्या कुणाचेही काही बरे अथवा वाईत करू शकत नाहीत. त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावणे हास्यास्पद आहे. असाच तर्कसंगत निष्कर्ष निघतो. डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे ओझे फेकून देऊन स्वच्छ बुद्धीने विचार केला तर हे कोणालाही पटेल. पण अंधश्रद्धा अढळ असतात. त्या माणसाला विचार करू देतच नाहीत. ही देवस्थाने आणि तिथे जाणारे भक्त यांच्या संरक्षणासाठी शासनाला केवढी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते.! यावरून निर्जीव देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही हे स्पष्ट दिसते. तरी भक्तांना तो सर्वशक्तिमानच वाटतो. केवढी ही दृढ (अंध)श्रद्धा !
- यनावाला

1 comment:

  1. बरोबर आहे समाजातील उच्यशिक्षीत, आमदार ,खासदार,
    मंत्री यांनी सर्व जनतेला सांगितले तर बरे

    ReplyDelete