Monday, March 24, 2014

धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग!


भारतात पुरातन काळी जसे धर्म निर्माण झाले तशीच धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानेही निर्माण झाली. म्हणजे धार्मिक कर्मकांडे (मुर्तीपूजा अथवा यज्ञ) यांना डावलत मानवी जीवनाचा चैतन्यवादी आणि जडवादी पद्धतीने विचार करणारे जे तत्वज्ञान निर्माण झाले त्याला आपणे शुद्ध अथवा धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान म्हणू शकतो. या तत्वज्ञानांत प्राचीन मानली गेलेली १२ उपनिषदे, सांख्य-वैशेषिकादि दर्शने आणि लोकायत/बार्हपस्त्य अथवा चार्वाक नावाने ओळखली जाणारी तत्वज्ञाने सामील होतात. अजित केशकंबल, मंस्खली गोशालादि स्वतंत्र विचारवंतही या परंपरेत होऊन गेले. चार्वाक तत्वज्ञान सांख्यांप्रमाणेच निरिश्वरवादी असले तरी पुढील काळात ते मात्र पुर्णतया अव्हेरले गेले...तर बाकीच्या तत्वज्ञानांवर सोयीप्रमाणे अन्य धर्मांनी डल्ला मारला. म्हणजे भारतात पुढे निर्माण झालेल्या धर्मांवर या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव तर राहिलाच पण केवळ "आस्तिक" आहेत या समजातून वैदिक धर्मियांनी लोकायत वगळता औपनिषदिक व अन्य दर्शनांतील तत्वज्ञाने आपल्या धर्मग्रंथांचा एक भाग बनवली.
खरे तर वेदांनी जे विचार सांगितले त्यापेक्षा वेगळेच नव्हे तर वेदविरोधी विचार प्राचीन उपनिषदांत आढळतात. सृष्टीच्या मुळाशी उपनिषदकारांनी एक तत्व कल्पिले व त्या तत्वाला "ब्रह्म" हे नांव दिले. याचा कोणत्याही देवतेशी, वर्णाशी अथवा धर्मसंकल्पनेशी संबंध नाही. ब्रह्म-आत्मा यांचा एकमेकांशी संबंध, पंचमहाभुते, शरीर-मन-ईंद्रिये, नैतिक संकल्पना, माणसाची मरणोत्तर गती, पुनर्जन्मादि संकल्पनांचा तत्वविचार ज्यात केला गेला आहे ती उपनिषदे होत. वेदांनी पुरस्कारिलेली यज्ञीय संस्कृती त्यांनी सर्वस्वी नाकारली असून यज्ञीय कर्मकांडाचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर यज्ञादि कर्मे करणा-या पुरोहितांची रांग ही आंधळ्या माळेप्रमाणे असते असे मुंड्क व कठोपनिषदात म्हटले आहे. वेद हे फुटक्या नांवांप्रमाने आहेत असाही वेदनिषेध उपनिषदांनी केला आहे.
असे असले तरी औपनिषदिक तत्वज्ञान उच्च दर्जाचे आहे अथवा सुसंगतीने मानवी जीवनविचार करणारे आहे असे नाही. सर्वच उपनिषदे परस्परविरोधांनी आणि आंतरविरोधांनी भरलेली आहेत. असे असले तरी भारतीय तत्वज्ञानाचा उदय उपनिषदांपासून सुरु झाला असे मानता येईल एवढेच पुरावे आपल्याहाती आहेत.
दर्शनांपैकी सांख्य, वैशेषिक आणि मीमांसा ही तीन दर्शने निरिश्वरवादी आहेत. पण मीमांसा वेद आणि यज्ञ यांना केंद्रीभूत ठेवुनच रचली गेली असल्या त्यांतील तत्वज्ञानाला सर्वस्वी अवैदिक म्हणता येत नाही. पण तिन्ही दर्शने नास्तिक आहेत, ते ईश्वराला अथवा ब्रह्माला निर्मितीकारण मानत नाहीत हे येथे महत्वाचे आहे. सांख्य आणि वैशेषिक तत्वज्ञाने नुसती निरिश्वरवादी आहेत असे नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोनाकडून मानव आणि विश्वाकडे पाहनारी ती तत्वज्ञाने आहेत.
वरील सा-या तत्वपरंपरा भौगोलिक दृष्ट्या एकाच भागात निर्माण झालेल्या नाहीत. एकाच काळात अथवा एकाच कोणत्या समाजानेही त्यांना निर्माण केलेले नाही. उपनिषदांचेच घ्यायचे तर त्यांची रचना जवळपास सहा-सातशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात झाली असे बहुतेक विद्वानांचे मत आहे. भुगोलाचे म्हणाल तर गंगेच्या खो-यापासून ते दक्षीणेतील नर्मदेपर्यंत त्यांचा भौगोलिक विस्तार आहे. या प्रदिर्घ काळातील असंख्य ग्रंथ आज अप्राप्य आहेत अथवा कालौघात नष्ट झालेले आहेत. परंतू मानवी जीवन, सृष्टीनिर्मिती आणि त्या सा-याचे मुलकारण तपासत, जीवनाचे गूढ शोधत धर्मनिरपेक्ष वृत्तींनी ही तत्वज्ञाने निर्माण झाली आहेत यात शंका नाही.
या सर्व तत्वज्ञानांत ख-या अर्थाने प्रखर बुद्धीवादी विचार मांडले असतील तर ते चार्वाक अथवा लोकायतिकांनी. या तत्वज्ञानाचा प्रभाव बुद्धपुर्व काळापासून असल्याचे संकेत बौद्ध वाड:मयात मिळतात. विनयपिटकात बुद्धाने भिक्षूंना लोकायतशास्त्र शिकण्याची बंदी घातली होती असे उल्लेख मिळतात. (भा. सं. कोश आणि "In the Vinay Pitaka the Buddhist Monks were forbidden to occupy with this (Lokayat) doctrine. (India's Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158)) म्हणजे बुद्धकाळापर्यंत लोकायतिक तत्वज्ञानाचा बराच प्रसार झाला होता असे लक्षात येते.
सत्यशोधन श्रद्धेने होऊ शकनार नाही हा लोकायतिकांचा पहिला सिद्धांत...जो सर्वच विज्ञानांचा मुलाधार आहे. श्रद्धा हे आंधळ्या धार्मिकांचे काम. श्रद्धेने सत्य सापडत नसून ते फक्त बुद्धीवादी तर्कानेच सापडू शकते या मुलाधारावर उभा राहिलेला हा विचार. या विचाराच्या विविध शाखा/आचार्य यांनी मिळुन जे तत्वज्ञान रचले ते लोकायतीक अथवा चार्वाक दर्शन म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने या दर्शनाला सर्वच धर्मियांनी पराकोटीचा विरोध केल्याने ही शाखा पुढे लूप्त झाली आणि ग्रंथही. पण सातव्या शतकातील आदी शंकराचार्यांपर्यंत सूत्रकारांना चार्वाक मताचे खंडण करणे अपरिहार्य झाल्याचे दिसते. यावरून चार्वाकांचा प्रभाव किमान सातव्या शतकापर्यंत भारतात होता असे अंदाजिता येते. या खंडण प्रक्रियेसाठी पुर्वपक्ष म्हणून चार्वाकांची मते घेऊन उत्तरपक्षात त्यांचे खंडण केले जात असे. अशा खंडणप्रक्रियेसाठी म्हणून जेथे जेथे चार्वाकांची मते आली आहेत त्यावरून आज आपल्याला पुर्ण नसला तरी चार्वाक दर्शनाचा अंदाज येतो.
काय आहे चार्वाक दर्शन?
चार्वाक दर्शन नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी सुत्ररुपाने आपण हे तत्वज्ञान समजावून घेऊयात.
१. या दर्शनात धर्माला, पाप-पुण्याच्या संकल्पनांना, परलोकाला स्थान नाही. येथेच जन्म आणि येथेच मृत्य़ु ही यांची धारणा असून "मूळ तोडले असता वृक्ष पुन्हा वाढत नाही, तद्वतच मनुष्य मेला कि त्याचा पुनर्जन्म होणे शक्य नाही." असे हे दर्शन सांगते. त्यामुळे मृत्योत्तर लोक अथवा जीवन साहजिकच नाकारले जाते. मृत्यू म्हणजेच मोक्ष अशी या तत्वज्ञानाची धारणा आहे. "जे काही आहे ते याच लोकात" म्हणून या तत्वज्ञानाला लोकायतिक हे नांव पडले. ईश्वर म्हणून कोणीही नसून परलोकाला जाणारा जीव दिसत नसल्याने परलोकही नाही असे सिद्धांतन आहे.
२. हे दर्शन पुर्णतया निरिश्वरवादी असून भौतिक सुखवाद/ईहवाद हा या तत्वज्ञानाचा पाया आहे. "काम" आणि "अर्थ" (म्हणजे जीवनावश्यक आहार-विहार-मैथुनादि) हेच पुरुषार्थ असून अन्य सर्व, धर्म आणि मोक्ष, हे पुरुषार्थ त्याने नाकारले आहेत. लोकायतिकांच्या दृष्टीने मानवी स्वातंत्र्य हाच मोक्ष असून पारतंत्र्य हे बंधन मानले आहे. त्याच वेळीस जगात धर्मच नसल्याने अधर्मही नाही असे हे तत्वज्ञान मानते व "स्वभाव" हेच जगताचे कारण आहे असे ते सांगते.
३. हे तत्वज्ञान वैदिक धर्मविरोधी (वेदांचा उघड निषेध करते म्हणून) असल्याने चातुर्वर्ण्यादी कल्पना व श्राद्धादि सर्वच कर्मकांडे धुडकावते. अग्निहोत्र, भस्मचर्चन ही बुद्धी आणि पौरुष यांनी हीन असलेल्या लोकांच्या उपजिविकेची साधने होत असे हे दर्शन मानते.
भंड, धूर्त व निशाचरांनी तीन वेद निर्माण केले असून जर्भरी-तुर्फरी असले निरर्थक शब्द उच्चारणे हेच पंडितांचे काम होय. वेद हे अप्रमाण आहेत, ते अपौरुषेय नसून ईश्वरच नसल्याने ईश्वरकृतही नाहीत आणि त्यांना स्व-प्रामाण्यही नाही असेही लोकायतिक म्हणतात.
४. प्रत्यक्ष हेच खरे प्रमाण असून अनुमान हे प्रमाण होऊ शकत नाही. लोकप्रसिद्ध अनुमान (सर्वमान्य) मानायला मात्र लोकायतिकांची हरकत नाही.
५. शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी ई. उपायांनी पैसे कमवून शहाण्यांनी नेहमी जगात सुखोपभोग घ्यावा. असेही जमले नाही तर कर्ज करावे पण सुखाने जगावे असेही हे तत्वज्ञान सांगते. (शेवटच्या भागाला अतिरेकी प्रसिद्धी देऊन लोकायतिक मताला बदनाम करण्यासाठी वापरले हे उघड आहे.)
६. ज्याची उपयुक्तता उघड दिसते, तो राजा म्हणजेच परमेश्वर होय!
७. दंडनिती हीच खरी विद्या, अर्थ आणि गांधर्व (गानविद्या) हेच खरे वेद. प्रत्यक्षानुभवाला येत असल्याने अर्थ-काम शास्त्र असलेले लोकायतशास्त्र हेच खरे शास्त्र होय.
८. मुखादि अवयव हे सर्वांच्या शरीरात असतांना वर्णभेद मानणे योग्य नाही.
९. पातिव्रत्यादी संकेत बुद्धीहीन लोकांनी निर्माण केले आहेत. येथे लोकायतिक स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करतात.
१०. दु:खाच्या भयाने सुखाचा त्याग करणे हा मुर्खपणा असून सुखार्थी माणसाने तांदळातून आपण तुस काढून तांदुळ वापरतो त्याप्रमाणे दुख्खद भाग वगळून सुख घ्यावे. आप्तजनांवरही अंधश्रद्धा ठेवू नये. श्रद्धेने सत्याचा शोध लागत नाही. अज्ञात गोष्टींचा पाठपुरावा करण्याऐवजी ऐहिक जीवन सुखकर कसे होईल ते पहावे. व्रत-तप-उपवास करून शरीराचे हाल करुन परलोकातील अज्ञात जीवनाची कामना त्याज्ज्य आहे.
पृथ्वी, आप, वायू व तेज ही चार तत्वे लोकायतिक मान्य करतात व त्यांच्या समुदायाने देह बनतो (इंद्रिये व विषय) असे म्हणतात. या तत्वांच्या संयोगाने चैतन्य निर्माण होते व चैतन्य विशिष्ट देह म्हणजे शरीर होय असेही हे तत्वज्ञान मानते.
आता आपण लोकायतिक मताचे नीट आलोकन केले तर लक्षात येईल हे मत अत्यंत तर्कनिष्ठ, बुद्धीवादी आणि इहवादी आहे. अन्य अवैदिक/निरिश्वरवादी तत्वज्ञानापेक्षा ते जास्त प्रत्यक्षवादी...जडवादी आहे. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानल्यामुळे एकार्थाने हा विचार विज्ञानवादीही आहे. सर्वदर्शन संग्रहात "चार्वाकवाद्यांचे विचार हे सर्वांना समजण्यासारखे असल्याने ते खोडुन काढणे कठीण आहे." असे म्हटले आहे. यातच "चार्वाक मताचा स्वीकार केल्याने बहुजनांचे कल्याण होईल. चार्वाक मत सुखवादी असले तरी ते उच्छृंखल भोगवादाला थारा देत नाही." असेही या ग्रंथात म्हटले आहे.
चार्वाक मताची धास्ती वैदिक धर्माने तर घेतलीच पण शैव, बौद्ध व जैन या अवैदिक धर्मांनीही घेतली होती यावरून ते मत किती लोकप्रिय असेल हे अंदाजिता येते. याचे कारण म्हणजे चार्वाकांनी वैदिक मतांचे अथवा मुर्तीपुजकांचेच खंडण केले असे नव्हे तर जैन व बौद्ध आगमांवरही त्यांनी हल्ले चढवले. लोकायतिक मुळात धर्मच मानत नसल्याने त्यांनी कोणत्याही अस्तित्वातील धर्मांवर हल्ले चढवणे स्वाभाविकही होते. त्यांच्या तर्कवादापुढे अन्य धर्मियांची किती पंचाईत झाली असेल हे आपण त्यांच्या वरील तत्वज्ञानावरुनच पाहू शकतो. रामायणात भरताजवळ रामाने लोकायतिकांची भरपूर निंदा केलेली आहे तर महाभारतात एका चार्वाकाला राक्षस म्हणून ब्राह्मणांनी जाळून भस्म केल्याचे शांतीपर्वात नोंदले आहे तर शल्यपर्वात एक चार्वाक दुर्योधनाचा मित्र होता असा उल्लेख आहे. विनयपिटकात बुद्धाने भिक्षुंना लोकायतशास्त्र शिकवण्यास बंदी घातल्याचा उल्लेख आहे तर जैन ग्रंथांत या दर्शनाला "मिथ्यादृष्टीचा एक आविष्कार" म्हटले आहे. वैदिक व शैवांतील जवळपास सर्वच पंडितांनी चार्वाक मताचे खंडण करण्यात हिरिरीने भाग घेतलेला दिसतो. त्यामुळे गेल्या हजार-बाराशे वर्षांत हे तत्वज्ञान जनमानसातुनही पुसले गेले.
चार्वाक मताची निर्मिती ही उपनिषदांच्या समकालीनच झाली असावी कारण चार्वाकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न बृहदारण्यकोपनिषदांसारख्या काही उपनिषदांत आले आहेत. उपनिषद्काल हा सनपूर्व सातवे-आठवे शतक गृहित धरला तर इ.स. च्या सातव्या शतकात झालेल्या आदी शंकराचार्यांच्या काळापर्यंत तरी निश्चितपणे या मताचे प्राबल्य होते असे म्हनता येते. या प्रदिर्घ, जवळपास एक हजार वर्षांच्या काळात अर्थातच या मताचे अनेक आचार्य/तत्वज्ञ झाले असतील. परंतू त्यांचे ग्रंथच "लोप" पावल्यामुळे त्यांची नांवे आपल्याला माहित नाही. जी मते आज उपलब्ध आहेत ती लोकायतिकांची जेवढी मते खंडनासाठी वापरली गेली तेवढ्यापुरती.
या तत्वज्ञानाचा मुळ निर्माता कोण हे आपल्याला ठाऊक नाही. चार्वाक ही व्यक्ती नसून लोकायतिक मताचे पर्यायी नांव होते हे तर सिद्धच आहे. या मताला बार्हपस्त्य मत असेही क्वचित संबोधले गेले होते पण तेवढ्यामुळे बृहस्पती हा या मताचा जन्मदाता होता
हेही सिद्ध होत नाही. फार तर एखादा बृहस्पती नांवाची व्यक्ती या प्रदिर्घ कालातील एखादी आचार्य होऊन गेली असावी.
परंतु या तत्वज्ञानाच्या जन्मदात्याची एवढी चवकशी करण्याचे कारणही नाही. कोणत्याही मानवी समुदायात जेंव्हा धार्मिक स्तोमे माजू लागतात तेंव्हा त्यांतील वैय्यर्थता जाणवणारे व्यक्तिसमुदायही पुढे येतात व तर्कबुद्धीने त्या स्तोमांचा निषेध करत असतात. जीवनाकडे परलोकवादी दृष्टीने न बघता ईहवादी द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत असतात. तर्काने, प्रत्यक्ष अनुमानाने जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. ख-या अर्थाने हे प्रबोधनपर्वाचे अग्रणी विचारक असतात. त्यांचे तत्वज्ञान रुढी-परंपरा व धर्मांची गारुडे असणा-यांना मानवणे शक्य नसते. त्यांची चौफेर निंदा होणे स्वाभाविकच असते. लोकायतिकांचेही तसेच झाले.
"यावज्जीवेत सुखंजीवेत ऋणं कृत्वा-घृतं पिबेत" या चार्वाक वचनाचा सोयिस्करपणे "लोकायतिक हे अनीतिमान आहेत." हे जनमानसावर ठसवण्यासाठी वापरले गेलेले विधान. पण लोकायतीक आधी शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी आदि मार्गाने धन मिळवावे व सुखाने जगावे असे सांगत जेंव्हा त्याचा अभाव असेल तर कर्जही काढायला हरकत नाही असे म्हणतात हे मात्र टाळले गेले हे येथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. फेडण्याची क्षमताच नसेल तर चैनीसाठी कोणी यावज्जीव कर्ज देणार नाही हा साधा विचार लोकायतिक मताच्या खंडणकर्त्यांना सुचला नाही. परंतू एखादे मत नष्टच करायचे ठरवले तर धर्मपंडित ज्या पद्धतीने आपली प्रतिभा (?) पणाला लावतात तसेच पुढे लोकायतिकांच्या बाबतीत झाले असे म्हणता येईल.
लोकायतिक मत हे सुखवादी आहे, भोगवादी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या गोष्टीचा (आत्मा, ईश्वर, परलोक ई) प्रत्यक्ष अनुभव येत नाही, येऊ शकत नाही त्यासाठी देह झिजवण्याला त्यांचा ठाम विरोध आहे. लोकायतिक भारतातील एकमेव इहवादी विचारधारा होती असे म्हणण्यास काहीएक प्रत्यवाय नाही.
इहवादी विचारधारेतुनच विज्ञानाचा रस्ता मोकळा होतो हे एक सत्य. युरोपातील प्रबोधनकाळ इहवादातुनच निर्माण झाला व त्यातून औद्योगिक क्रांती घडली हे एक वास्तव आहे. खरे तर भारतात इहवाद-सुखवाद लोकायतिकांनी सर्वात आधी आणला. परंतू त्याची तार्किक परिणती जी ऐहिक संसाधनांचे नवनवे शोध लागण्यात अथवा वैज्ञानिक संकल्पनांचा तार्किक पातळीवर लागण्यात व्हायला हवी होती तशी ती झाली नाही हेही एक वास्तव आहे. खरे तर या तत्वज्ञानात प्रबोधनाला अत्यावश्यक असलेले सारे तत्वज्ञान ठासून भरलेले आहे.
पण सुखवादी तत्वज्ञानाची भोगवादी, चंगळवादी अशी हेटाळणी सर्वच धर्मग्रंथांनी, पुराणांनी व शंकराचार्यांसारख्या प्रकांड विद्वानांनी केल्याने आधी अनेक शतके लोकप्रिय असणारे तत्वज्ञान मागे फेकले गेले. वैदिकांनी आपलेच म्हणून घोषित केल्यावर सांख्य-वैशेषिकांच्या वैज्ञानिक आणि मुळात अनिश्वरवादी-जडवादी असलेल्या तत्वज्ञानाचेही तेच झाले. हे आपल्या भारतियांचे दुर्दैव होय.
लोकायतिक केवळ तर्ककर्कश बंडखोर होते असे नाही. ते बुद्धीवादी होते. त्यांचा मानवी जीवन व्यवहाराकडे पहायचा दृष्टीकोन विज्ञाननिष्ठ होता. त्यांनी वर्णभेद-जातीभेद या आजच्या समाजालाही ग्रासणा-या बाबींचा निषेध प्राचीन काळापासुनच केला. स्त्रीयांना बंधनात ठेवणे त्यांना मान्य नव्हते. जीवनात दु:ख असले तरी ते बाजुला सारून केवळ सुखच निवडावे असा समतोल विचार त्यांनी मांडला. म्हणजे जीवन मुळात सुख-दु:खाचे संमिश्रण आहे हे त्यांना मान्य होते. एकांगी विचार लोकायतिकांनी केल्याचे आढळत नाही.
राजसत्ता ही प्रत्यक्ष असल्याने तिच श्रेष्ठ आहे असे म्हणत त्यांनी ही सत्ता विवेक आणि न्यायाने परिपूर्ण असली पाहिजे असे वास्तवदर्शी व बुद्धीप्रामाण्यवादी विचार त्यांनी मांडले.
आणि सर्वात धाडसी पण सार्वकालिक होऊ शकनारा सिद्धांत त्यांनी मांडला...तो म्हणजे त्यांनी धर्मांची आवश्यकताच नाकारली. खरे तर हा अत्यंत बंडखोर विचार होय. धर्मांनी समस्त मानवी जीवन जखडून टाकले असता मानवी स्वातंत्र्य हाच एकमेव मोक्ष होय असे उच्चरवाने सांगणारे चार्वाक/लोकायतिक आजही कालसुसंगत आहेत. अनुकरणीय आहेत. कारण आजही आपण धर्मांनी, भेदभावयुक्त धर्मतत्वांनी प्रचंड घेरलो गेलेलो आहोत. धर्ममय जग म्हटले तर आज कोणता धर्म समस्त जगाचे कल्याण करू शकेल यावर प्रचंड वितंडे आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या पुराणता आणि श्रेष्ठत्वाच्या घमेंडीत आहे आणि त्यातून अगदी हिंसकही संघर्ष जगभर उद्भवत आहेत हे आपण नित्य पाहतो. धर्मांतर्गतही विवाद आहेत.
अशा परिस्थितीत लोकायतिक मत हे खरा मार्ग दाखवते. धर्म आणि ईश्वरी सत्ता नसलेले...फक्त मानवी स्वातंत्र्याचे मानवासाठीच असलेले जग ही आपली खरी गरज आहे. आणि लोकायतिक मत हे आपल्याला आजही मार्गदर्शक ठरू शकते.
-संजय सोनवणी

Monday, March 17, 2014

गर्भसंस्कार: एक थोतांड


आपले मूल (बहुदा एकच होऊ देत असल्यामुळे... सर्वात महत्वाचे झालेले ते मुल) हुशार, सुंदर, कर्तृत्ववान व्हावं ही प्रत्येक आई-बापाची स्वाभाविक इच्छा... नैसर्गिकच. आता व्यापारी जगात या नैसर्गिक इछेचा फायदा घेऊन अनेक गर्भसंस्कारांची दुकानं गावोगाव उघडली गेली आहेत.
हजारो रुपये घेऊन ‘गर्भसंस्कारामध्ये प्रशिक्षण देणारे’ वर्ग चालवले जात आहेत.
‘नुकसान तर नाही ना?’
‘आणि आयुर्वेदात आहे... मग शास्त्रीयच असणार ना?’
या दोन वाक्यांत ही सुशिक्षित गिऱ्हाईकं सहजपणे आपल्या आधुनिक ‘अभिमन्यू’साठी काही हजार रुपये खर्च करताना दिसत आहेत. ‘अभिमन्यू’ हे एकच उदाहरण ‘मार्केट’ करून हे तथाकथित व्यापारी गिऱ्हाईकं खेचतात.
ठीक. आपण उदाहरण बघू... शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा जिजाबाई गर्भवती होत्या तेव्हा अक्षरशः मोगल पाठीवर घेऊन पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची/भावाची हत्या झाली. त्यांना ना व्यापारी भेटले ना गर्भसंस्कार केले! तरी शिवाजी महाराजांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडले! जिजाबाईंचा जरूर वाटा आहे. किंबहुना त्या माता होत्या म्हणूनच शिवाजी महाराज घडले.
पण हे ‘जन्मानंतर’च्या संस्कारांमुळे. गर्भसंस्कारांमुळे नाही! पुराणकाल (अभिमन्यू) व भूतकाळ (शिवाजी महाराज) यांच्या उदाहरणानंतर आपण आजच्या परिस्थितीकडे येऊ.
भारतातील सधन वर्ग जो पैसे टाकून गर्भसंस्कार घेऊ शकतो हा एकीकडे अन् छोटी गावं, गरिबी यात गर्भसंस्कारासाठी कुठे पैसा आणणार असा मध्यमवर्गीय एकीकडे. आज एशिया व कॉमनवेल्थमध्ये ज्यांनी मेडल्स मिळवली आहेत, त्यात खूप जास्त संख्या ही ग्रामीण भागातून आलेल्या, धडपडणाऱ्या मुलां-मुलींची आहे. उदा. कविता राऊत ही नाशिकमधल्या आदिवासी भागातील मुलगी! आज दीर्घ पल्ल्याची सर्वोत्तम धावपटू आहे. गर्भसंस्कार हा शब्दही तिच्या आईने ऐकला नाही- तरी.
डॉ. कन्ना मडावी हा माझ्याप्रमाणे स्त्रीरोगतज्ञ! कांदोटी या आजही मागासलेल्या व दुर्गम भागात जन्मलेला आणि लोकबिरादरमध्ये १९७६ साली येऊन शिक्षण घेतलेला कन्ना- एम.डी. झाला. अॅडव्होकेट लालचू नौगोटी-जुनी या छोट्या आडगावातल्या; वडील व आई दोघंही लहानपणीच वारले. तो एम.ए.एल.एल.बी. झाला.
ही दोन हेमलकसाची प्रातिनिधीक उदाहरणं. अर्धनग्न, अर्धपोटी, अशिक्षित आईबापांपोटी व आदिवासी व दुर्गम भागात जन्म घेतलाय यांनी! अनेक हजार वर्षांतही या भागात आयुर्वेद पोचलाच नव्हता. डॉ.प्रकाश व डॉ. मंदा यांच्या रुपानं आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रकाशाची तिरीप प्रथम पोचली ती १९३ ला. या अशा परिस्थितीत या मुलांवर गर्भसंस्कार कुठून येणार?
तरीही मुलं शिकली व परत गडचिरोली भागातच परतली. तिथं ती आपल्या ज्ञानाचा फायदा आदिवासींना करून देत आहेत.  गर्भसंस्कारांमुळे हे घडलं नाही तर बाबा, प्रकाश, मंदा आमटे यांच्या मदतीच्या हातानं हा चमत्कार घडला!
या सर्व उदाहरणांनी अभिमन्यूची कथा किती फोल आहे व जन्मानंतरचे संस्कार, जिद्द, प्रेरणा कर्तृत्वासाठी किती महत्वाचे ठरतात हे आपण सहजपणे स्वतःच बघू शकतो. गर्भसंस्कार मार्केट करणाऱ्यांकडे फक्त एका अभिमन्यूची कथा आहे. आपल्यासमोर गर्भसंस्काराशिवाय नोबेल, ऑलिम्पिक व इतर मेडल मिळवणाऱ्यांची प्रत्यक्ष फौज आहे. तेव्हा कथेच्या मोहातून आपण बाहेर पडू या.
आता गर्भसंस्कारांचा तथाकथित शास्त्रीय/वैज्ञानिक मुखवटा आपण तपासून बघूया.
गर्भसंस्कार वर्गात हे घडते.
१.       चर्चा, कौन्सेलिंग- मान्य
२.       आहार मार्गदर्शन- मान्य
३.       व्यायाम मार्गदर्शन- मान्य
४.       आनंदी राहण्याची सूचना- मान्य
५.       नवरा-सासूचा सहभाग- मान्य
हे सर्व कोणीही सुजन व्यक्ती मान्य करेल. त्यासाठी ‘गर्भसंस्कार’ हा मुखवटा घ्यायची गरज नाही.
गर्भावर संस्कार करण्यासाठी, पूर्णपणे त्याची बुद्धी वाढवण्यासाठी मातेला ‘मंत्र’ शिकवले जातात. हे मात्र पूर्ण अमान्य.
गर्भ पोटात असताना मंत्र म्हणून त्याची बुद्धी वाढू शकते हा विश्वास शास्त्रीय आहे व त्यासाठी आयुर्वेदात ‘मंत्र’ दिले आहेत, असा गर्भसंस्कारांचा पाया सांगितला जातो...
या पायाची दोन पद्धतीनं आपण चिकित्सा करू.
अ)     आयुर्वेदात काय आहे?
आ)   आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?

अ)     आयुर्वेदात काय आहे?
आयुर्वेदात अनेक वैज्ञानिक कसोट्यांवर उतरणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर बाळंतपणानंतर ‘वार’ कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. तसेच त्याकाळात गर्भपात अटळ असेल तर ‘राजाची’ परवानगी घ्या अशी कायदेशीर यंत्रणाही दर्शवली गेली आहे.
आयुर्वेदाला विरोध म्हणून गर्भसंस्काराला विरोध अशी आमची भूमिका नाही. आमचे आयुर्वेदातील तज्ञ सहकारी अनेक व्याधी आज व्यवस्थित पद्धतीने हाताळतात व या सर्वांबद्दल आम्हाला व्यावसायिक आदर आहे. आयुर्वेद ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे व अर्थातच त्यातली काही निरीक्षणे/अनुमाने व उपाय कालबाह्य झाले आहेत.
उदाहरणं अशी:
(अष्टांग हृदय, वाग्भट कृत)
१.       गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो.
२.       पाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर नवरा मरतो.
३.       पाळीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर बाळ पोटात मरते. –(सार्थ भाव प्रकाश) पूर्वखंड श्लोक १३-१६, वैद्य नानल यांची प्रत
४.       पाळीनंतर सम रात्री (२,४,६,८,१०,१२) संभोग केला तर पुत्र होतो व विषम रात्री (५,७,९) केला तर कन्या होते.
(पाळीनंतर पहिल्या 10 दिवसांत गर्भधारणाच होऊ शकत नाही हे शास्त्रीय सत्य आज शाळांतही शिकवलं जातं.)
५.       शरीरात ३०८ हाडं आहेत. (पाचवा अध्याय) आजच्या शास्त्राप्रमाणे २०६.
६.       गर्भाधान संस्कार: गर्भधारणा होण्याचे ठिकाण, त्यावेळची मानसिक अवस्था याचा गर्भावर होणारा परिणाम. उदा. समागमाच्या खोलीत अडगळ नको. (आज हे किती जोडप्यांना शक्य आहे?)
७.       अनवमोलन संस्कार: यात गर्भपातापासून सुटका सांगितली आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहपीडा यामुळे होणारा.
३००० वर्षांपूर्वीचं आयुर्वेद अर्थातच तत्कालीन मर्यादांचा विचार करूनच वाचलं गेलं पाहिजे.
निष्कर्ष:
आयुर्वेद हे ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे ही त्याची मर्यादा आज मान्य करायला हवी. खुद्द वाग्भटानं असं नमूद केलं आहे की आयुर्वेद हे परिवर्तनशील शास्त्र आहे व क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे आद्य कर्तव्य आहे. क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे म्हणजे- नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा, सतत पुढे जाणं, अचूकतेकडं प्रवास करणं. ते करायला हवं!
आ)   आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?
काही गर्भसंस्कार करणारे तर हेही बिनदिक्कत सांगतात की, आजच्या शास्त्राप्रमाणे गर्भसंस्कार वैज्ञानिकच आहेत.
आधुनिक वैद्यकशास्त्र काय सांगते?
१) गर्भाची गर्भाशयामधली वाढ व क्षमता अशी विकसित होते.
तीन महिन्यांचा गर्भ: हात, पाय, डोळे, हृदय, किडनी, आतडी, मेंदूही प्राथमिक स्वरुपात तयार.
चार महिन्यांचा गर्भ: ऐकू शकतो. म्हणजे आवाजाची जाणीव होण्यासाठी मेंदूचा भाग थोडा विकसित होतो. ऐकणं... म्हणजे आवाज ऐकणं. ऐकून समजणं नव्हे.
चौथ्या महिन्याअखेर: Myelination मायलीनेशन म्हणजे मज्जातंतूवरचं आवरण. ह्याची सुरुवात होते. मायलीनेशन झाल्याशिवाय मज्जातंतू काम करू शकत नाहीत. त्यांचे काम संवेदना इकडून तिकडे पोचवण्याचे असते.
जन्मवेळेपर्यंत: जेमतेम १२ ते १५% मज्जातंतू हे मायलीनेशनचे असतात, व त्यामुळे श्वसन, हृद्य, आतडं अशा जीवनावश्यक क्रियाच फक्त शक्य असतात. ‘समजण्या’साठी (ऐकून/वाचून) अजून बाळ तयार नसते. हे मायलीनेशन जन्मानंतरही चालूच राहते व ते वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत पूर्ण होते.
२) शिक्षणक्षमता (गर्भाची)
३२ आठवडे पूर्व गर्भाला ही शिक्षण क्षमता थोडीबहुत येते. मात्र ही Habituation हॅबीच्युएशन या प्रकारची असते.
ती Reflex असते. प्रतिक्षिप्त क्रिया असते. ती Response नसते, प्रतिसाद नसतो.
अगदी एकपेशीय आमीबाही त्यावर प्रकाशाचा तीव्र झोत टाकला तर आक्रसून दूर होतो!
म्हणजे
-ओरडणे (आवाज आदळणे)
-बोलणे (आवाज येणे)
-मंत्रोच्चार (आवाज येणे)
-फटाके (आवाज आदळणे)
-हॉरर मुव्ही (आवाज आदळणे)
-शास्त्रीय संगीत (आवाज येणे)
या सर्व Stimulus ला... उत्तेजनेला- गर्भ प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया देतो- एवढेच त्याचं ऐकणं असतं! उदा. आई हॉरर मुव्ही बघत असेल तर आवज व आईच्या दचकण्यामुळे गर्भ हलतो.
तसाच तो आई अत्यानंदाने ओरडली तरी हलतो. हॅबीच्युएशनची प्रतिक्रिया म्हणजे ‘शिक्षण’ नव्हे.
केवळ या मुलभूत क्षमतेचा वापर गर्भसंस्कार व्यापारासाठी करतात. ते म्हणतात, ’बघा... बाळ ऐकतंय.’
बाळाला ऐकू येतं... पण गोंगाटाच्या स्वरुपात! त्यात शिक्षण घेण्याची क्षमता नसते.
३) बाळाला ऐकू येतं?
वर सांगितल्याप्रमाणे त्याला ऐकू येतो तो गोंगाट. आवजाची संवेदना. गर्भसंस्कारात आई मंत्रोच्चार करते. हा आवाज बाळापर्यंत पोचतो का? तर पोचतो, पण क्षीण! बाळाच्या आजूबाजूला गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या असतात. मागे भला मोठा अेओर्टा असतो. यातून जाणाऱ्या रक्ताचा आवाज बाळापर्यंत पोहोचतो, तो ६० ते ८० डेसिबलचा! म्हणजे बाळ आर्टरीचा, हा मोठ्या आवाजात डिस्को ऐकत असतं दिवसरात्र!
त्यात हा पुटपुटण्याचा (मंत्रांचा) आवाज कसा पोहोचणार? शक्यच नाही.
किंबहुना मायलीनेशन होत नाही व बाळ काही ‘समजू’ शकत नाही हे बाळाला वरदानच आहे. नाहीतर या गोंगाटानं ते बधीर व्हायचं!
४) आईच्या मनातील भावनांचा व तिच्या विचारांचा, गर्भावर काय परिणाम होतो?
उत्तर: काहीही नाही.
पुरावा: Dizygotic Twins.
यामध्ये दोन बाळं एकाचवेळी आईच्या गर्भाशयात असतात. यात एक मुलगा व एक मुलगी किंवा दोन्ही मुलगे/दोन्ही मुली असं काहीही असू शकतं. यांची जनुकं वेगळी असल्याने त्यांच्यात शारीरिक साधर्म्य कमी प्रमाणात असतं. पूर्णपणे भिन्न असतात.
आता आईचे विचार, तिचा आचार व तिने केलेले ‘संस्कार’ दोघांसाठी ‘एकच’ असताना ही भिन्नता कशी? पुढे जाऊन प्रत्येकाचं कर्तृत्व पूर्णपणे वेगळं असतं. थोडक्यात आईच्या इच्छेवर बाळ सुंदर, बुद्धिमान बनत नाही. अजिबात नाही.
अशा गर्भसंस्कारामुळे पसरणाऱ्या समजुती घातक आहेत. मातेचा गर्भारपणाचा सहज आनंद या समजुती मातीत मिळवतात. एक OBSESSION मातेमध्ये रुजवतात. जणू बाळाचं भवितव्य तिच्या हातात आहे! हल्ली झटपट व पैसे टाकून सर्व, अगदी आरोग्यही, विकत मिळते अशी रूढ समजूत आहे. पैसे फेका... मंत्रोचार शिका. पैसा फेका- क्लास लावा, आपलं मूल- बिल गेट्स.
भयंकर सापळा आहे हा... व तो बाळाला पकडतो. गर्भसंस्कार करून बाहेर पडलेलं बाळ बुद्धीनं सामान्य निघालं तर आईला धक्का बसतो. इतकं हे Obsession  या गर्भसंस्काराच्या खुळामुळे पसरते आहे.
या सगळ्या Instant व पैसे टाकून विकत मिळवायच्या शर्यतीत आपण मुळात व्यक्ती/बाळ शिकते कसे ते लक्षात घेत आहोत का?
५) व्यक्ती शिकते कशी?
खालील learning pyramid बघा.
(शिक्षणाचा आराखडा)
सर्वसाधारण व्यक्ती वेगवेगळ्या मार्गानं शिकत असते. ते मार्ग व त्यांची उपयुक्तता अशी. (आईनस्टाईन वगैरे अपवाद. ते सोडून द्यायचे. आपण सर्वसाधारण व्यक्ती आहोत, आपलं मूलही तसंच आहे, हे वास्तव आधी मान्य करूया.)
सर्वसाधारण व्यक्ती अशी शिकते
१०% वाचणे, २०% ऐकणे व पाहणे, ३०% प्रयोग बघणे व करणे, ५०% मनन व चर्चा, ७५% ज्ञानाचा उपयोग करून, ९०% दुसऱ्यांना शिकवून.
आपण बघितलं की गर्भाला मुळात मायलीनेशन नसल्यामुळे फक्त आवाजाची संवेदना समजते. त्यातून ते अर्थ समजू शकत नाही. वादापुरतं असं मान्य केलं की तो समजतो, पण मग जो विषय आपण शिकवतो (गर्भारपणी काय शिकवतो? गणित?) पण जरी शिकवलं गणित गर्भारपणी, तरी ते ऐकून फक्त शिकणार म्हणजे ते वाचू शकणार नाही, प्रयोग बघू शकणार नाही. करू शकणार नाही, त्या ज्ञानाचा उपयोग ‘तेव्हाच’ करू शकणार नाही.
२०% शिकण्याची क्षमता उपयोगात येईल आली तर! अर्थातच बाळ पोटात आईनं म्हटलेलं मंत्र ऐकून शिकते ही एक पूर्ण अंधश्रद्धा आहे. मातृत्वाच्या टप्प्याला मातेनं व तिच्या नवऱ्यानं नीट आत्मसात करावं. त्याचं मनन करावं. ते वापरावं आपल्या बळावर.
समारोप
‘गर्भसंस्कार’ करायला जाणाऱ्या सुशिक्षित स्त्री/पुरुषांची दोन गृहीतं असतात. ‘नुकसान तर नाही ना?’ आणि ‘आयुर्वेदात आहे मग वैज्ञानिकच असणार ना!’
यात ‘आयुर्वेदा’ची व आधुनिक विज्ञानाची ही कसोटी लावली तर ‘गर्भसंस्कार’ वैज्ञानिक नाहीत. Evidence based नाहीत हे आपण बघितलं. आता ‘नुकसान तर नाही ना?’ या मुद्द्याकडे येऊ या.
खलील जिब्रान म्हणतो तसं तुमचं बाळ हे सुटलेला बाण आहे. अगदी गर्भावस्थेपासून ते वेगळी ‘स्वतंत्र’ व्यक्ती आहे. गर्भसंस्कारांसारखे अट्टाग्रह मनात धरून त्याचा रोबो करू नका. आई-बाप आहात... आधार द्या, प्रेम द्या, थोडी शिक्षाही करा.
पण त्याच्या व्यक्तिमत्वाला फुलवा. आपली स्वप्न... आपले हट्टाग्रह लादू नका. पालकांच्या हट्टाग्रहाची सुरुवात गर्भसंस्कारांचे मंत्रपठण करून होते... ही वाट धोक्याची आहे... सावध असा!
गर्भसंस्कारांना आपण जातो तेव्हा, आपण आपल्या बाळाकडून अवास्तव अपेक्षांची सुरवात गर्भावस्थेतच करतो! हे मोठं नुकसानच आहे, नाही का? म्हणून प्रत्येक वाचकानं स्वतःला हा प्रश्न विचारावा.
...खरं-खोट्याचा बेमालूम व्यापार मांडून गर्भसंस्कार विकणारे विकत असतील बाजारात...
पण मी अवैज्ञानिक व अवास्तव अपेक्षांनी भारून जाऊन त्यांना बळी का पडतेय/पडतोय?
गर्भसंस्कार करायचे नाहीत तर काय करायचं?
तर मातृत्व उपनिषद वाचायचं. त्यातलं ज्ञान मिळवायचं. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या आपल्या बाळाची व्यवस्थित जडणघडण घडेल, मातृत्वाचे त्रास कमी होतील, धोके आधी समजतील. मातृत्व सुखद, समाधानी, सुखरूप ठरेल. डिलीव्हरीनंतर निव्वळ स्तनपान करायचं. आदर्श हे... की पहिले ६ महिने फक्त स्तनपान! त्यासाठी आईचा आहार... गर्भवती असताना होता तेवढाच किंवा त्याहूनही जास्त महत्वाचा आहे. बाहेरचं दूध, पावडरी... कशाचीही गरज नाही.
हल्ली मुली नोकऱ्या व करिअर करतात. ठीक. जेवढे महिने जमेल तेवढं-
१. तात्पुरती, दोन वर्षं फक्त, गृहिणी व्हायचा पर्याय सर्वोत्तम शक्य आहे. (सरकारसुद्धा सहा महिने मॅटर्निटी लीव्ह... बाळंतपणाची रजा देते.)
आर्थिक गरज नसेल तर शक्य होईलही कदाचित. विचार तर करा. हा पर्याय विचारात घ्या.
२. किमान पहिले चार महिने निव्वळ स्तनपान.
३. नंतर बालरोगतज्ञाच्या सल्ल्याने गरज असेल तर, बाहेरचं दूध व इतर आहार.
जन्मतः मायलीनेशन फक्त १२ ते १५% व पहिल्या ३ वर्षात पूर्ण. अर्थातच बाळाच्या दृष्टीनं हा कालखंड सर्वात महत्वाचा. त्याचं पोषण/आहार अत्यंत काटेकोर व योग्य असावा. (बालरोगतज्ञाची मदत घ्या.)
४. लसीकरण पूर्ण व त्या त्या वेळेवर.
५. बाळाशी बोलणं महत्वाचं... खूप बोलणं.
जन्मल्यापासून बोलवं... गर्भसंस्कारांच्या वेळचा मंत्रोच्चार काही उपयोगाचा नाही. आता बोलणं उपयोगाचं.
६. संस्कार हे ‘बोलून’ होत नाहीत. ते करून होतात. जे काही मुलानं/मुलीनं करावं असं वाटतं ते आपण करावं. बाळ स्वभावतःच आई वडिलांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतं.
सर्वात शेवटी
आपलं मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपल्याला जे जमत नाही (बुद्धीमुळे, कमी क्षमतांमुळे वा परिस्थितीमुळे) त्या गोष्टी करणारं ते यंत्र नाही. ही समज महत्वाची. नाही का?
खात्री आहे आमची... की आजचे होणारे आई-बाबा... खूप संवेदनशील, उत्साही व सजग आहेत.
सारासार विचार करून निर्णय घेणारे आहेत. सदिच्छा.

 लेखक- डॉ. अरुण गद्रे

Sunday, March 2, 2014

कसे ओळखायचे भ्रामक विज्ञान?

शाळा, महाविद्यालयांत विज्ञान नीटपणे शिकवले जात नाही. वैज्ञानिकांनी कोणते शोध लावले हे सांगितले जाते; पण आतापर्यंत लागलेल्या शोधांची जंत्री म्हणजे विज्ञान नव्हे. शोधांमागची प्रक्रिया म्हणजे विज्ञान. प्रश्‍न कसे उभे राहतात, त्यांची संभाव्य उत्तरे आहे काय असू शकतात, संभाव्य उत्तराचा खरे-खोटेपणा कसा जोखायचा, त्यासाठी प्रयोग, निरीक्षणे कशी करायची, नोंदी कशा ठेवायच्या, त्यातून निष्कर्ष कसे काढायचे, त्यासाठी गणिते मांडावी लागली, तर कशी मांडायची, संख्याशास्त्राचा योग्य उपयोग कसा करायचा, सिद्धान्तांची मांडणी कशी करायची, कोणत्या निकषांवर एखादा सिद्धान्त मान्य अथवा अमान्य होतो, या सगळ्यांमागची तत्त्वे आणि ती अमलात आणण्याच्या पद्धती म्हणजे विज्ञान. ही मूलभूत तत्त्वे आणि पद्धती आत्मसात न करता कितीही माहिती गोळा केली, तरी त्याला विज्ञान म्हणता येत नाही. 

विज्ञानाविषयी विज्ञान शिक्षणातच इतके अज्ञान असल्यानंतर त्याचा गैरफायदा घ्यायला अनेक मंडळी सरसावली तर आश्‍चर्य वाटायला नको. विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या भेटीतच मी "ज्योतिष हे विज्ञान आहे काय?' हा प्रश्‍न विचारतो. गेली अनेक वर्षे पहिल्या वर्षाच्या पहिल्या तासाला हा किंवा यासारखा प्रश्‍न मी विचारत आलो आहे. (मला मिळणाऱ्या उत्तरांमध्ये अर्थातच "हो' आणि "नाही' असे पक्ष असतात. त्यापुढे जाऊन का "हो' किंवा का "नाही' असे विचारले, तर येणाऱ्या उत्तरांमध्ये चकित करणारी विविधता असते.) "अमुक-तमुक' हे विज्ञान आहे काय, असा प्रश्‍न विचारला, तर त्याच्या उत्तरात दोन टप्पे असायला हवेत. पहिल्या टप्प्यात विज्ञान कशाला म्हणतात, विज्ञानाचे निकष कोणते, ते कळले पाहिजेत आणि दुसऱ्या टप्प्यात ते "अमुक-तमुक' या निकषांमध्ये बसते की नाही, हे पाहिले पाहिजे. विज्ञान कशाला म्हणायचे, हे सामान्यांना नीटसे माहीत नसेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण विज्ञानाची पदवी घेताना तरी ते समजलेले असायला हवे; पण फार थोड्या पदवीधरांना ते समजलेले असते. 

सुदैवाने अथवा दुर्दैवाने एखादी गोष्ट विज्ञानाधारित आहे, असे म्हटले, की पटकन समाजमान्य होते. पण विज्ञान म्हणजे नक्की काय, याचे चित्र समाजाच्या मनात पक्के नाही. त्यामुळे विज्ञानाचा मुखवटा पांघरून आपला माल खपवायला बसलेल्यांची या जाहिरातींच्या युगात मुळीच कमतरता नाही. यातून होणारी सामान्यांची फसवणूक कशी टाळायची, हा मुख्य प्रश्‍न आहे. मला तरी याचे एकच उत्तर दिसते, ते म्हणजे विज्ञानाची मूलभूत तत्त्वे आणि पद्धती समजून घेणे. 

सुरवातीला विचारलेल्या प्रश्‍नाचेच उदाहरण घेऊ. त्यातून विज्ञानाची तत्त्वे थोडीफार तरी स्पष्ट करता येतील. ज्योतिषशास्त्र ग्रहमानावरून भाकीत वर्तवते. हवामानशास्त्र हवामानाविषयी भाकीत वर्तवते. दोघांचीही भाकिते कधी बरोबर येतात, कधी चुकतात. मग हवामानशास्त्र विज्ञान असेल, तर ग्रहज्योतिष हे विज्ञान का नाही? विज्ञानाचा पहिला निकष हा, की केलेली भाकिते वस्तुनिष्ठ असायला हवीत. पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडेल हे भाकीत वस्तुनिष्ठ आहे. कारण अनेक वर्षांच्या सरासरीची पद्धतशीर नोंद आहे आणि पाऊस मोजण्याच्या प्रमाणित पद्धतीही आहेत."या महिन्याच्या 6, 12 व 13 तारखा शुभ आहेत. चांगल्या घटना घडतील,' हे भाकीत वस्तुनिष्ठ नाही. कारण शुभ म्हणजे नक्की काय, याचे प्रमाणित मोजमाप नाही. एकाला जे शुभ वाटते, ते दुसऱ्याला अशुभ वाटत असेल, तर शुभ तारीख हे वस्तुनिष्ठ भाकीत नाही. ज्योतिष्याने वस्तुनिष्ठ आणि मोजता येणारी भाकिते केली, तर विज्ञानाच्या परीक्षेचा पहिला पेपर पास झाला, असे म्हणता येईल. दुसरा पेपर पास होण्यासाठी या भाकितांचे खरेपण पाहावे लागेल. यासाठी शंभर टक्के भाकिते खरी होण्याची आवश्‍यकता नाही. पावसाचे अंदाज अथवा वैद्यकशास्त्राचे रोगाविषयीचे अंदाज कुठे शंभर टक्के बरोबर असतात? एखादा सिद्धान्त, तत्त्व किंवा पद्धत वापरून केलेला अंदाज, ते न वापरता केलेल्या अंदाजापेक्षा पुरेशी अधिक अचूकता देत असेल, तर त्या तत्त्वाला किंवा पद्धतीला पुष्टी मिळाली, असे म्हणता येईल. "पुरेशी अधिक' म्हणजे किती अधिक, हे ठरवण्याच्या प्रमाणित संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. सामान्य ज्ञान वापरून केलेल्या अंदाजापेक्षा ग्रहांची स्थिती पाहून केलेली भाकिते वस्तुनिष्ठ मोजमापांवरून जास्त प्रमाणात खरी ठरली, तर दुसरा पेपर पास झाला, असे म्हणता येईल. हवामानाचे अंदाज अनेकदा चुकत असले, तरी त्यांनी ही संख्याशास्त्रीय चाचणी पास केलेली असते. दोन, पेपर म्हणजे पूर्ण पदवी परीक्षा नाही. संख्याशास्त्रीयदृष्ट्या कोंबडा आरवणे आणि सूर्य उगवणे यातला सहसंबंध खूप घट्ट आहे. कोंबडा आरवण्यावरून सूर्योदयाचे भाकीत करता येते. (पण म्हणून कोंबडा आरवण्याने सूर्य उगवला असे म्हणता येत नाही.)ज्यांच्यामधला सहसंबंध दाखवता येतो, त्यांच्यामधला कार्यकारणभाव दाखवणे, ही पुढची खूप महत्त्वाची पायरी. कार्यकारणभाव शोधण्याचा काही एक ठोक सरधोपट फॉर्म्युला नाही. इथे वैज्ञानिकाची विचारशक्ती, कल्पकता आणि सर्जनशीलता पणाला लागते. यातून एक किंवा अनेक प्रमेये (हायपॉथिसिस) तयार होतात. त्यापुढची परीक्षा म्हणजे या प्रमेयाची पडताळणी करणे. ती करण्याचा मार्ग परत मागल्या वळणावर जातो. प्रत्येक प्रमेयाने चाचणी घेता येईल, असे काही नवीन भाकीत केले पाहिजे. चाचणीवरून हे प्रमेय तगणार, का फेकून द्यावे लागणार, ते ठरते. कधी एखादे प्रमेय असे असते, की त्याची चाचणी घेण्याचा काही मार्ग नसतो. ज्याची चाचणी घेता येत नाही असे प्रमेय विज्ञानाला मान्य नाही. अशा चाचण्यांमधून उत्तीर्ण झालेला कार्यकारण संबंध हा विज्ञानाचा गाभा आहे. 

ज्या प्रश्‍नांनी आपण सुरवात केली, त्याचे उत्तर मी दिले नाही; देणारही नाही; पण याचे उत्तर कसे शोधायचे, याचा मार्ग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मार्ग समजला, तर फेंग-शुई, वास्तुशास्त्र ही विज्ञाने आहेत काय, यांचीही उत्तरे ज्याला त्याला मिळतील. यामागचे तत्त्व सोपे आहे. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची विशिष्ट पद्धत म्हणजे विज्ञान. ही पद्धत वापरली तर संगीतकलासुद्धा विज्ञान आहे आणि पाठ्यपुस्तके पाठ करून पदवी मिळवली, तर भौतिक विज्ञानसुद्धा विज्ञान नाही. शाळा-महाविद्यालयांमधून खऱ्या अर्थाने विज्ञान शिकवायला आपण कधी सुरवात करणार? 
- डॉ. मिलिंद वाटवे
(लेखक विज्ञानाचे अध्यापक व संशोधक आहेत.)