Showing posts with label संस्कार. Show all posts
Showing posts with label संस्कार. Show all posts

Saturday, September 26, 2015

संस्कारांचा अंधश्रद्ध सापळा

आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.

डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com

डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

Monday, March 17, 2014

गर्भसंस्कार: एक थोतांड


आपले मूल (बहुदा एकच होऊ देत असल्यामुळे... सर्वात महत्वाचे झालेले ते मुल) हुशार, सुंदर, कर्तृत्ववान व्हावं ही प्रत्येक आई-बापाची स्वाभाविक इच्छा... नैसर्गिकच. आता व्यापारी जगात या नैसर्गिक इछेचा फायदा घेऊन अनेक गर्भसंस्कारांची दुकानं गावोगाव उघडली गेली आहेत.
हजारो रुपये घेऊन ‘गर्भसंस्कारामध्ये प्रशिक्षण देणारे’ वर्ग चालवले जात आहेत.
‘नुकसान तर नाही ना?’
‘आणि आयुर्वेदात आहे... मग शास्त्रीयच असणार ना?’
या दोन वाक्यांत ही सुशिक्षित गिऱ्हाईकं सहजपणे आपल्या आधुनिक ‘अभिमन्यू’साठी काही हजार रुपये खर्च करताना दिसत आहेत. ‘अभिमन्यू’ हे एकच उदाहरण ‘मार्केट’ करून हे तथाकथित व्यापारी गिऱ्हाईकं खेचतात.
ठीक. आपण उदाहरण बघू... शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा जिजाबाई गर्भवती होत्या तेव्हा अक्षरशः मोगल पाठीवर घेऊन पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची/भावाची हत्या झाली. त्यांना ना व्यापारी भेटले ना गर्भसंस्कार केले! तरी शिवाजी महाराजांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडले! जिजाबाईंचा जरूर वाटा आहे. किंबहुना त्या माता होत्या म्हणूनच शिवाजी महाराज घडले.
पण हे ‘जन्मानंतर’च्या संस्कारांमुळे. गर्भसंस्कारांमुळे नाही! पुराणकाल (अभिमन्यू) व भूतकाळ (शिवाजी महाराज) यांच्या उदाहरणानंतर आपण आजच्या परिस्थितीकडे येऊ.
भारतातील सधन वर्ग जो पैसे टाकून गर्भसंस्कार घेऊ शकतो हा एकीकडे अन् छोटी गावं, गरिबी यात गर्भसंस्कारासाठी कुठे पैसा आणणार असा मध्यमवर्गीय एकीकडे. आज एशिया व कॉमनवेल्थमध्ये ज्यांनी मेडल्स मिळवली आहेत, त्यात खूप जास्त संख्या ही ग्रामीण भागातून आलेल्या, धडपडणाऱ्या मुलां-मुलींची आहे. उदा. कविता राऊत ही नाशिकमधल्या आदिवासी भागातील मुलगी! आज दीर्घ पल्ल्याची सर्वोत्तम धावपटू आहे. गर्भसंस्कार हा शब्दही तिच्या आईने ऐकला नाही- तरी.
डॉ. कन्ना मडावी हा माझ्याप्रमाणे स्त्रीरोगतज्ञ! कांदोटी या आजही मागासलेल्या व दुर्गम भागात जन्मलेला आणि लोकबिरादरमध्ये १९७६ साली येऊन शिक्षण घेतलेला कन्ना- एम.डी. झाला. अॅडव्होकेट लालचू नौगोटी-जुनी या छोट्या आडगावातल्या; वडील व आई दोघंही लहानपणीच वारले. तो एम.ए.एल.एल.बी. झाला.
ही दोन हेमलकसाची प्रातिनिधीक उदाहरणं. अर्धनग्न, अर्धपोटी, अशिक्षित आईबापांपोटी व आदिवासी व दुर्गम भागात जन्म घेतलाय यांनी! अनेक हजार वर्षांतही या भागात आयुर्वेद पोचलाच नव्हता. डॉ.प्रकाश व डॉ. मंदा यांच्या रुपानं आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रकाशाची तिरीप प्रथम पोचली ती १९३ ला. या अशा परिस्थितीत या मुलांवर गर्भसंस्कार कुठून येणार?
तरीही मुलं शिकली व परत गडचिरोली भागातच परतली. तिथं ती आपल्या ज्ञानाचा फायदा आदिवासींना करून देत आहेत.  गर्भसंस्कारांमुळे हे घडलं नाही तर बाबा, प्रकाश, मंदा आमटे यांच्या मदतीच्या हातानं हा चमत्कार घडला!
या सर्व उदाहरणांनी अभिमन्यूची कथा किती फोल आहे व जन्मानंतरचे संस्कार, जिद्द, प्रेरणा कर्तृत्वासाठी किती महत्वाचे ठरतात हे आपण सहजपणे स्वतःच बघू शकतो. गर्भसंस्कार मार्केट करणाऱ्यांकडे फक्त एका अभिमन्यूची कथा आहे. आपल्यासमोर गर्भसंस्काराशिवाय नोबेल, ऑलिम्पिक व इतर मेडल मिळवणाऱ्यांची प्रत्यक्ष फौज आहे. तेव्हा कथेच्या मोहातून आपण बाहेर पडू या.
आता गर्भसंस्कारांचा तथाकथित शास्त्रीय/वैज्ञानिक मुखवटा आपण तपासून बघूया.
गर्भसंस्कार वर्गात हे घडते.
१.       चर्चा, कौन्सेलिंग- मान्य
२.       आहार मार्गदर्शन- मान्य
३.       व्यायाम मार्गदर्शन- मान्य
४.       आनंदी राहण्याची सूचना- मान्य
५.       नवरा-सासूचा सहभाग- मान्य
हे सर्व कोणीही सुजन व्यक्ती मान्य करेल. त्यासाठी ‘गर्भसंस्कार’ हा मुखवटा घ्यायची गरज नाही.
गर्भावर संस्कार करण्यासाठी, पूर्णपणे त्याची बुद्धी वाढवण्यासाठी मातेला ‘मंत्र’ शिकवले जातात. हे मात्र पूर्ण अमान्य.
गर्भ पोटात असताना मंत्र म्हणून त्याची बुद्धी वाढू शकते हा विश्वास शास्त्रीय आहे व त्यासाठी आयुर्वेदात ‘मंत्र’ दिले आहेत, असा गर्भसंस्कारांचा पाया सांगितला जातो...
या पायाची दोन पद्धतीनं आपण चिकित्सा करू.
अ)     आयुर्वेदात काय आहे?
आ)   आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?

अ)     आयुर्वेदात काय आहे?
आयुर्वेदात अनेक वैज्ञानिक कसोट्यांवर उतरणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर बाळंतपणानंतर ‘वार’ कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. तसेच त्याकाळात गर्भपात अटळ असेल तर ‘राजाची’ परवानगी घ्या अशी कायदेशीर यंत्रणाही दर्शवली गेली आहे.
आयुर्वेदाला विरोध म्हणून गर्भसंस्काराला विरोध अशी आमची भूमिका नाही. आमचे आयुर्वेदातील तज्ञ सहकारी अनेक व्याधी आज व्यवस्थित पद्धतीने हाताळतात व या सर्वांबद्दल आम्हाला व्यावसायिक आदर आहे. आयुर्वेद ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे व अर्थातच त्यातली काही निरीक्षणे/अनुमाने व उपाय कालबाह्य झाले आहेत.
उदाहरणं अशी:
(अष्टांग हृदय, वाग्भट कृत)
१.       गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो.
२.       पाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर नवरा मरतो.
३.       पाळीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर बाळ पोटात मरते. –(सार्थ भाव प्रकाश) पूर्वखंड श्लोक १३-१६, वैद्य नानल यांची प्रत
४.       पाळीनंतर सम रात्री (२,४,६,८,१०,१२) संभोग केला तर पुत्र होतो व विषम रात्री (५,७,९) केला तर कन्या होते.
(पाळीनंतर पहिल्या 10 दिवसांत गर्भधारणाच होऊ शकत नाही हे शास्त्रीय सत्य आज शाळांतही शिकवलं जातं.)
५.       शरीरात ३०८ हाडं आहेत. (पाचवा अध्याय) आजच्या शास्त्राप्रमाणे २०६.
६.       गर्भाधान संस्कार: गर्भधारणा होण्याचे ठिकाण, त्यावेळची मानसिक अवस्था याचा गर्भावर होणारा परिणाम. उदा. समागमाच्या खोलीत अडगळ नको. (आज हे किती जोडप्यांना शक्य आहे?)
७.       अनवमोलन संस्कार: यात गर्भपातापासून सुटका सांगितली आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहपीडा यामुळे होणारा.
३००० वर्षांपूर्वीचं आयुर्वेद अर्थातच तत्कालीन मर्यादांचा विचार करूनच वाचलं गेलं पाहिजे.
निष्कर्ष:
आयुर्वेद हे ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे ही त्याची मर्यादा आज मान्य करायला हवी. खुद्द वाग्भटानं असं नमूद केलं आहे की आयुर्वेद हे परिवर्तनशील शास्त्र आहे व क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे आद्य कर्तव्य आहे. क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे म्हणजे- नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा, सतत पुढे जाणं, अचूकतेकडं प्रवास करणं. ते करायला हवं!
आ)   आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?
काही गर्भसंस्कार करणारे तर हेही बिनदिक्कत सांगतात की, आजच्या शास्त्राप्रमाणे गर्भसंस्कार वैज्ञानिकच आहेत.
आधुनिक वैद्यकशास्त्र काय सांगते?
१) गर्भाची गर्भाशयामधली वाढ व क्षमता अशी विकसित होते.
तीन महिन्यांचा गर्भ: हात, पाय, डोळे, हृदय, किडनी, आतडी, मेंदूही प्राथमिक स्वरुपात तयार.
चार महिन्यांचा गर्भ: ऐकू शकतो. म्हणजे आवाजाची जाणीव होण्यासाठी मेंदूचा भाग थोडा विकसित होतो. ऐकणं... म्हणजे आवाज ऐकणं. ऐकून समजणं नव्हे.
चौथ्या महिन्याअखेर: Myelination मायलीनेशन म्हणजे मज्जातंतूवरचं आवरण. ह्याची सुरुवात होते. मायलीनेशन झाल्याशिवाय मज्जातंतू काम करू शकत नाहीत. त्यांचे काम संवेदना इकडून तिकडे पोचवण्याचे असते.
जन्मवेळेपर्यंत: जेमतेम १२ ते १५% मज्जातंतू हे मायलीनेशनचे असतात, व त्यामुळे श्वसन, हृद्य, आतडं अशा जीवनावश्यक क्रियाच फक्त शक्य असतात. ‘समजण्या’साठी (ऐकून/वाचून) अजून बाळ तयार नसते. हे मायलीनेशन जन्मानंतरही चालूच राहते व ते वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत पूर्ण होते.
२) शिक्षणक्षमता (गर्भाची)
३२ आठवडे पूर्व गर्भाला ही शिक्षण क्षमता थोडीबहुत येते. मात्र ही Habituation हॅबीच्युएशन या प्रकारची असते.
ती Reflex असते. प्रतिक्षिप्त क्रिया असते. ती Response नसते, प्रतिसाद नसतो.
अगदी एकपेशीय आमीबाही त्यावर प्रकाशाचा तीव्र झोत टाकला तर आक्रसून दूर होतो!
म्हणजे
-ओरडणे (आवाज आदळणे)
-बोलणे (आवाज येणे)
-मंत्रोच्चार (आवाज येणे)
-फटाके (आवाज आदळणे)
-हॉरर मुव्ही (आवाज आदळणे)
-शास्त्रीय संगीत (आवाज येणे)
या सर्व Stimulus ला... उत्तेजनेला- गर्भ प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया देतो- एवढेच त्याचं ऐकणं असतं! उदा. आई हॉरर मुव्ही बघत असेल तर आवज व आईच्या दचकण्यामुळे गर्भ हलतो.
तसाच तो आई अत्यानंदाने ओरडली तरी हलतो. हॅबीच्युएशनची प्रतिक्रिया म्हणजे ‘शिक्षण’ नव्हे.
केवळ या मुलभूत क्षमतेचा वापर गर्भसंस्कार व्यापारासाठी करतात. ते म्हणतात, ’बघा... बाळ ऐकतंय.’
बाळाला ऐकू येतं... पण गोंगाटाच्या स्वरुपात! त्यात शिक्षण घेण्याची क्षमता नसते.
३) बाळाला ऐकू येतं?
वर सांगितल्याप्रमाणे त्याला ऐकू येतो तो गोंगाट. आवजाची संवेदना. गर्भसंस्कारात आई मंत्रोच्चार करते. हा आवाज बाळापर्यंत पोचतो का? तर पोचतो, पण क्षीण! बाळाच्या आजूबाजूला गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या असतात. मागे भला मोठा अेओर्टा असतो. यातून जाणाऱ्या रक्ताचा आवाज बाळापर्यंत पोहोचतो, तो ६० ते ८० डेसिबलचा! म्हणजे बाळ आर्टरीचा, हा मोठ्या आवाजात डिस्को ऐकत असतं दिवसरात्र!
त्यात हा पुटपुटण्याचा (मंत्रांचा) आवाज कसा पोहोचणार? शक्यच नाही.
किंबहुना मायलीनेशन होत नाही व बाळ काही ‘समजू’ शकत नाही हे बाळाला वरदानच आहे. नाहीतर या गोंगाटानं ते बधीर व्हायचं!
४) आईच्या मनातील भावनांचा व तिच्या विचारांचा, गर्भावर काय परिणाम होतो?
उत्तर: काहीही नाही.
पुरावा: Dizygotic Twins.
यामध्ये दोन बाळं एकाचवेळी आईच्या गर्भाशयात असतात. यात एक मुलगा व एक मुलगी किंवा दोन्ही मुलगे/दोन्ही मुली असं काहीही असू शकतं. यांची जनुकं वेगळी असल्याने त्यांच्यात शारीरिक साधर्म्य कमी प्रमाणात असतं. पूर्णपणे भिन्न असतात.
आता आईचे विचार, तिचा आचार व तिने केलेले ‘संस्कार’ दोघांसाठी ‘एकच’ असताना ही भिन्नता कशी? पुढे जाऊन प्रत्येकाचं कर्तृत्व पूर्णपणे वेगळं असतं. थोडक्यात आईच्या इच्छेवर बाळ सुंदर, बुद्धिमान बनत नाही. अजिबात नाही.
अशा गर्भसंस्कारामुळे पसरणाऱ्या समजुती घातक आहेत. मातेचा गर्भारपणाचा सहज आनंद या समजुती मातीत मिळवतात. एक OBSESSION मातेमध्ये रुजवतात. जणू बाळाचं भवितव्य तिच्या हातात आहे! हल्ली झटपट व पैसे टाकून सर्व, अगदी आरोग्यही, विकत मिळते अशी रूढ समजूत आहे. पैसे फेका... मंत्रोचार शिका. पैसा फेका- क्लास लावा, आपलं मूल- बिल गेट्स.
भयंकर सापळा आहे हा... व तो बाळाला पकडतो. गर्भसंस्कार करून बाहेर पडलेलं बाळ बुद्धीनं सामान्य निघालं तर आईला धक्का बसतो. इतकं हे Obsession  या गर्भसंस्काराच्या खुळामुळे पसरते आहे.
या सगळ्या Instant व पैसे टाकून विकत मिळवायच्या शर्यतीत आपण मुळात व्यक्ती/बाळ शिकते कसे ते लक्षात घेत आहोत का?
५) व्यक्ती शिकते कशी?
खालील learning pyramid बघा.
(शिक्षणाचा आराखडा)
सर्वसाधारण व्यक्ती वेगवेगळ्या मार्गानं शिकत असते. ते मार्ग व त्यांची उपयुक्तता अशी. (आईनस्टाईन वगैरे अपवाद. ते सोडून द्यायचे. आपण सर्वसाधारण व्यक्ती आहोत, आपलं मूलही तसंच आहे, हे वास्तव आधी मान्य करूया.)
सर्वसाधारण व्यक्ती अशी शिकते
१०% वाचणे, २०% ऐकणे व पाहणे, ३०% प्रयोग बघणे व करणे, ५०% मनन व चर्चा, ७५% ज्ञानाचा उपयोग करून, ९०% दुसऱ्यांना शिकवून.
आपण बघितलं की गर्भाला मुळात मायलीनेशन नसल्यामुळे फक्त आवाजाची संवेदना समजते. त्यातून ते अर्थ समजू शकत नाही. वादापुरतं असं मान्य केलं की तो समजतो, पण मग जो विषय आपण शिकवतो (गर्भारपणी काय शिकवतो? गणित?) पण जरी शिकवलं गणित गर्भारपणी, तरी ते ऐकून फक्त शिकणार म्हणजे ते वाचू शकणार नाही, प्रयोग बघू शकणार नाही. करू शकणार नाही, त्या ज्ञानाचा उपयोग ‘तेव्हाच’ करू शकणार नाही.
२०% शिकण्याची क्षमता उपयोगात येईल आली तर! अर्थातच बाळ पोटात आईनं म्हटलेलं मंत्र ऐकून शिकते ही एक पूर्ण अंधश्रद्धा आहे. मातृत्वाच्या टप्प्याला मातेनं व तिच्या नवऱ्यानं नीट आत्मसात करावं. त्याचं मनन करावं. ते वापरावं आपल्या बळावर.
समारोप
‘गर्भसंस्कार’ करायला जाणाऱ्या सुशिक्षित स्त्री/पुरुषांची दोन गृहीतं असतात. ‘नुकसान तर नाही ना?’ आणि ‘आयुर्वेदात आहे मग वैज्ञानिकच असणार ना!’
यात ‘आयुर्वेदा’ची व आधुनिक विज्ञानाची ही कसोटी लावली तर ‘गर्भसंस्कार’ वैज्ञानिक नाहीत. Evidence based नाहीत हे आपण बघितलं. आता ‘नुकसान तर नाही ना?’ या मुद्द्याकडे येऊ या.
खलील जिब्रान म्हणतो तसं तुमचं बाळ हे सुटलेला बाण आहे. अगदी गर्भावस्थेपासून ते वेगळी ‘स्वतंत्र’ व्यक्ती आहे. गर्भसंस्कारांसारखे अट्टाग्रह मनात धरून त्याचा रोबो करू नका. आई-बाप आहात... आधार द्या, प्रेम द्या, थोडी शिक्षाही करा.
पण त्याच्या व्यक्तिमत्वाला फुलवा. आपली स्वप्न... आपले हट्टाग्रह लादू नका. पालकांच्या हट्टाग्रहाची सुरुवात गर्भसंस्कारांचे मंत्रपठण करून होते... ही वाट धोक्याची आहे... सावध असा!
गर्भसंस्कारांना आपण जातो तेव्हा, आपण आपल्या बाळाकडून अवास्तव अपेक्षांची सुरवात गर्भावस्थेतच करतो! हे मोठं नुकसानच आहे, नाही का? म्हणून प्रत्येक वाचकानं स्वतःला हा प्रश्न विचारावा.
...खरं-खोट्याचा बेमालूम व्यापार मांडून गर्भसंस्कार विकणारे विकत असतील बाजारात...
पण मी अवैज्ञानिक व अवास्तव अपेक्षांनी भारून जाऊन त्यांना बळी का पडतेय/पडतोय?
गर्भसंस्कार करायचे नाहीत तर काय करायचं?
तर मातृत्व उपनिषद वाचायचं. त्यातलं ज्ञान मिळवायचं. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या आपल्या बाळाची व्यवस्थित जडणघडण घडेल, मातृत्वाचे त्रास कमी होतील, धोके आधी समजतील. मातृत्व सुखद, समाधानी, सुखरूप ठरेल. डिलीव्हरीनंतर निव्वळ स्तनपान करायचं. आदर्श हे... की पहिले ६ महिने फक्त स्तनपान! त्यासाठी आईचा आहार... गर्भवती असताना होता तेवढाच किंवा त्याहूनही जास्त महत्वाचा आहे. बाहेरचं दूध, पावडरी... कशाचीही गरज नाही.
हल्ली मुली नोकऱ्या व करिअर करतात. ठीक. जेवढे महिने जमेल तेवढं-
१. तात्पुरती, दोन वर्षं फक्त, गृहिणी व्हायचा पर्याय सर्वोत्तम शक्य आहे. (सरकारसुद्धा सहा महिने मॅटर्निटी लीव्ह... बाळंतपणाची रजा देते.)
आर्थिक गरज नसेल तर शक्य होईलही कदाचित. विचार तर करा. हा पर्याय विचारात घ्या.
२. किमान पहिले चार महिने निव्वळ स्तनपान.
३. नंतर बालरोगतज्ञाच्या सल्ल्याने गरज असेल तर, बाहेरचं दूध व इतर आहार.
जन्मतः मायलीनेशन फक्त १२ ते १५% व पहिल्या ३ वर्षात पूर्ण. अर्थातच बाळाच्या दृष्टीनं हा कालखंड सर्वात महत्वाचा. त्याचं पोषण/आहार अत्यंत काटेकोर व योग्य असावा. (बालरोगतज्ञाची मदत घ्या.)
४. लसीकरण पूर्ण व त्या त्या वेळेवर.
५. बाळाशी बोलणं महत्वाचं... खूप बोलणं.
जन्मल्यापासून बोलवं... गर्भसंस्कारांच्या वेळचा मंत्रोच्चार काही उपयोगाचा नाही. आता बोलणं उपयोगाचं.
६. संस्कार हे ‘बोलून’ होत नाहीत. ते करून होतात. जे काही मुलानं/मुलीनं करावं असं वाटतं ते आपण करावं. बाळ स्वभावतःच आई वडिलांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतं.
सर्वात शेवटी
आपलं मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपल्याला जे जमत नाही (बुद्धीमुळे, कमी क्षमतांमुळे वा परिस्थितीमुळे) त्या गोष्टी करणारं ते यंत्र नाही. ही समज महत्वाची. नाही का?
खात्री आहे आमची... की आजचे होणारे आई-बाबा... खूप संवेदनशील, उत्साही व सजग आहेत.
सारासार विचार करून निर्णय घेणारे आहेत. सदिच्छा.

 लेखक- डॉ. अरुण गद्रे