Saturday, November 22, 2014

वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही !!


जगात असा कुठलाही विषय नाही की ज्यात विज्ञान नाही. ह्या चरचरात विज्ञानच भरून राहीले आहे.निसर्गाचा शोध घेणे म्हणजेच विज्ञान. त्याला चारभिंतीच्या प्रयोगशाळेत बंदीस्त करणे ही आपली संकुचित विचारसरणी झाली. आईनस्टाइनने त्याचे शोध निसर्गाच्या प्रयोगशाळेत गणिती विचार करून लावले. याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोन हा माणसाला तत्वज्ञ बनवतो. आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यास प्रवृत्त करतो. त्यामध्ये धर्म,भावना,शब्द्प्रामण्य यापेक्षा सत्याची कसोटी महत्वाची ठरते. प्रत्येक गोष्टीचे documentation केल्यावरच त्याची सत्यासत्यता पडताळता येते. तेथे शब्द्प्रामण्यपेक्षा चिकीत्सेला महत्त्व असते. या पध्दतीनेच आजवर माणसाची प्रगती झाली आहे.
गोमूत्र प्यायाल्याने आणि शेण सारवल्याने वा खाल्याने तब्बेत सुधारते हे कुठल्याही authentic कोशात लिहीलेले नाही आणि सिध्दही झालेले नाही. ते फ़क्त लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीमुळे खरे वाटायला लागते. म्हणून या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी ठरतात.मग ती फ़क्त वैयक्तीक अनुभूती ठरते.सार्वत्रिक नव्हे.
योग, तुळस,वृक्ष, हळदीसारखी काही उदाहरणे वैज्ञानिकतेच्या निकषावर काही बाबतीत खरी असली तरी हनुमान चालीसामध्ये जरी NASA ची साक्ष (खरी असेल तर तो कागद प्रसिध्द करायला कोणाची हरकत आहे?) काढून सूर्य व पृथ्वीचे अंतर दिले आहे तरी कुठल्याही वैज्ञानिकाने त्यावर समर्थन दिलेले नाही. तसेच जानवे घातल्याने रोगांपासून बचाव होतो. (मग जानवेधारी आजारी का पडतात?) चरणस्पर्श केल्याने पाठीचा कणा निरोगी रहातो. (मग दहादा वाकून नमस्कार करणार्यांना स्पाँडीलायटीस का होतो?) दारावर तोरण लावल्याने वातावरण शुध्द होते. (उलट तोरणासाठी पाने-फुले तोडून आपण पर्यावरणाची हानी करत असतो.) दिवा लावल्याने पॉझिटीव्ह ऊर्जा वाढते. (मुळात ती आपल्या वृत्तीत असावी लागते.) कान टोचल्याने अस्थमा बरा होतो.( मग अनेक कान टोचलेल्या बाया अस्थामाग्रस्त का आहेत?) कुंकूम लावल्याने वशीकरणापासून बचाव होतो. (Hypnotist अनेक कुंकू लावलेल्या - टिकली नव्हे - स्त्रीयांना hypnotized कसे करू शकतात?) तिलक लावल्याने कपाळावरील अतिरिक्त पाणी शोषले जाते, शंख ध्वनी केल्याने डासांचा नाश होऊन मलेरीयापासून बचाव होतो. (मग शंखध्वनी करणारेच मलेरीयाग्रस्त का होतात? दुसरे असे की,भारतात आज मोठ्या प्रमाणात मलेरीयाचे रुग्ण वढताहेत तेव्हा करा की शंख ध्वनी! डॉक्टरांची गरज काय?) चिताग्नी दिल्याने प्रेताची योग्य विल्हेवाट लागून पर्यावरणाची हानी टळली जाते.(लाकडे जाळून प्रदूषण झाले तरी) उठाबशा वा कान खेचण्याच्या शिक्षेमुळे मेंदू तल्लख होतो आणि तोतरेपणा जातो यासारख्या गोष्टीत हास्यास्पद व चुकीचे विज्ञान सांगून ते वैज्ञानिक असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. यातील एकही मुद्दा कुठेही सिध्द झालेला नाही. हे सगळे आपल्या पूर्वजांना माहीत होते या अभिनिवेशाने लिहीले जाते. वैज्ञानिक पध्दतीत documentation ला महत्त्व असते,पुराण कथांना नाही.
कोणत्याही धर्मवाद्यांचे मुद्दे जर विज्ञानेतर असतील तर मग त्यातील प्रत्येक मुद्दयाचा वैज्ञानिक संबंध दाखवण्याचा अट्टाहास का? त्यांनी ही वैयक्तीक अनुभूती आहे असे स्पष्ट करावे, म्हणजे वादच मिटतो. मग त्यांनी Believe-Hinduism is based on science असं म्हणायला नको. खरी मखलाशी अशी असते की,ते विज्ञानाला अनुसरून आहे असे म्हटले की, सुशिक्षित लोक सहज स्वीकारातात, हे त्यांना पक्के ठाऊक असते.ह्याला बनवेगिरी म्हणतात.दुर्दैवाने आजचे सुशिक्षित (की फ़क्त साक्षर) धार्मिक अस्मितेचे आणि उन्मादाचे बळी ठरताहेत.
म्हणूनच मी म्हणतो, आजच्या सुशिक्षित माणसाने वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही. त्यातूनच हिन्दू धर्माला वैज्ञानिक लेबल लावायचा फोल प्रयत्न केला जातो.
विचार- जगदीश काबरे सर

No comments:

Post a Comment