Friday, May 17, 2013

यासाठी पुरावा काय?


प्रिय मीना, काल तुझी दहावीची परीक्षा संपली. त्यामुळे आता तू एका वेगळया मूडमध्ये असशील म्हणूनच काही महत्त्वाचे सांगण्यासाठी तुला पत्र लिहित आहे. मला हेही माहित आहे की, आजकाल तुम्हा मुलींना लांबलचक पत्र वाचण्याची सवय नाही. एस.एम.एस.वाचायची सवय जडलेली असल्यामुळे लेखी पत्र वाचण्याचा नक्कीच कंटाळा येत असावा. परंतु या अल्लड वयातच काही गोष्टी लक्षात राहतील आता तू तितकी लहानही नाहीस व तितकी मोठीही नाहीस. तुझ्या अगोदरच्यांची ज्या प्रकारे फसगत झाली तशी तुझी होऊ नये म्हणून मी पत्र लिहित आहे.
 आपल्याला माहित असलेल्या गोष्टी कशा काय माहित झाल्या याबद्दल तुला कधी आश्चर्य वाटले का? उदाहरणार्थ, आकाशातील लुकलुकणारे तारे रांगोळीच्या ठिपक्याएवढे दिसत असले तरी त्यांचा आकार फार फार मोठा असतो. त्यांच्यातून निघालेल्या प्रकाश किरणाला पृथ्वीवर पोचण्यासाठी लाखो करोडो वर्ष लागतात हे तुला माहित आहे का? त्या आपल्यापासून फार फार दूर आहेत हे आपल्याला कसे कळले? सूर्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह फिरत असतात; व पृथ्वीसुध्दा सूर्याभोवती फिरते हे कसे कळले? आपली पृथ्वी अगदीच लहान व चेंडूसारख्या गोल आकाराची आहे हे कसे कळले?
 या व अशा अनेक प्रश्नांना एकच उत्तर आहे तो म्हणजे 'पुरावा.' पुरावा म्हणजे प्रत्यक्ष पाहून(वा ऐकून, वास घेऊन, किंवा स्पर्श करून.....) खरे आहे की नाही हे ठरवणे. कल्पना चावलासारखे अंतराळयात्री पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर्स दूर जाऊन पृथ्वीकडे पाहून तो चेंडूच्या आकाराचा आहे, हे प्रत्यक्षपणे स्वत:च्या डोळयांनी पाहून ठरवतात. त्याचे छायाचित्र, व्हिडीओ चित्रण करून पाठवतात. अनेक वेळा आपल्या डोळयांना काही बाह्य मदतीची गरज भासते. आकाशातील तारा चमकणारा ठिपका वाटतो; परंतु टेलिस्कोपमधून तो एक सुंदर असा चेंडूसारखा दिसणारा शुक्र ग्रह असतो. म्हणजेच आपण त्याचे निरिक्षण करतो जे आपण पाहतो(ऐकतो, वास घेतो, स्पर्श करतो.....) त्यांना सामान्यपणे निरीक्षण म्हणतात.

 याचा अर्थ पुरावा म्हणजेच निरीक्षण नव्हे परंतु प्रत्येक ग्राह्य पुराव्यामागे निरीक्षण असतेच. एखाद्या व्यक्तीचा अज्ञात स्थळी खून झालेला असल्यास(खून झालेल्या व खून करणाऱ्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त) कुणी खून केला हे कळणार नाही. परंतु खुनाचा तपास करणारे पोलीस काही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावे गोळा करून खुनी व्यक्तीपर्यंत पोचत असतात. खून करण्यासाठी वापरलेल्या हत्यारावरील ठसे व आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत असल्यास तो पुरावा ग्राह्य धरला जातो. याचा अर्थ त्या व्यक्तिनेच तो खून केला असा होत नाही. परंतु खुनी व्यक्तीच्या विरुध्द आणखी काही भक्कम पुरावे गोळा करण्यास यातून मदत मिळते. अनेक वेळा गुन्ह्याचा तपास करणाऱ्यांना निरिक्षणातून कोडे सुटल्यासारखे वाटू लागते. सर्व पुराव्यांचा एकमेकांशी असलेला संबंध लक्षात घेऊन अमूक व्यक्तीनेच अमूक कारणासाठी खून केला आहे या निष्कर्षापर्यंत तपास करणारे पोचतात.
 या अफाट विश्वातील व आपण राहत असलेल्या जगातील सत्य गोष्टी काय आहेत याचा शोध घेणारे तज्ञ म्हणजेच वैज्ञानिक. एका अर्थाने गुन्ह्यांचा तपास करणाऱ्यासारखेच वैज्ञानिकही काम करत असतात. काही गृहितकांच्या आधारे सत्याच्या जवळपास जाण्याच्या प्रयत्नात ते असतात. अमूक गोष्ट खरे असल्यास अमूक रितीने ते घडायला हवे असे स्वत:शीच संवाद ते करू लागतात. यालाच आपण भाकित म्हणतो. पृथ्वी खरोखरच गोल असल्यास एकाच दिशेने जाणारी व्यक्ती, ज्या जागेपासून सुरवात करते त्याच जागेला पोचायला हवी. जेव्हा डॉक्टर तुम्हाला गोवर झाला आहे असे म्हणत असताना फक्त तुमच्या तोंडाकडे पाहून किंवा गोवर बघून तसे बिनदिक्कत म्हणत नसतात. पहिल्यांदा तुमच्याकडे बघून किंवा तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवरून गोवर झाल्याचा अंदाज मांडतात. मग मनातल्या मनात स्वत:शीच बोलत रोग लक्षणाची उजळणी करू लागतात...... डोळयात फोड....... डोळयाचा लालसर रंग..... कपाळाला हात लावून ताप आल्याची खात्री...... कानांची तपासणी..... श्वास घ्यायला लावणे..... इत्यादी तपासातून तुम्हाला गोवर झाले आहे असे रोगनिदान करतात. काही वेळा रक्त तपासणी, एक्स रे काढायला सांगतात. पुन:पुन्हा डोळे, कान, हात यांचे नीटपणे निरीक्षण करतात. व आपले अंदाज खरे ठरल्यानंतरच औषध-पाणी, इंजेक्शन इत्यादी उपचार करतात. वैज्ञानिकांची पध्दतीसुध्दा सामान्यपणे डॉक्टरांच्या पध्दतीसारखीच असते. 
 प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करू लागल्यास बऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवण्याची फार चुकीची कारणं आहेत हे लक्षात येईल व त्यासाठी कुठलाही पुरावा नाही हेही लक्षात येईल. सामान्यपणे रुढी, शब्द वा ग्रंथ प्रामाण्य, साक्षात्कार-अनुभूती अशी कारणे या गोष्टींच्या मागे लपलेल्या असतात. 
 मी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या वर्गात चर्चेसाठी म्हणून गेलो होतो. तेथील संयोजकाने विद्यार्थ्यांना आपण कशा-कशावर विश्वास ठेवता असे प्रश्न विचारले. जी काही उत्तरं ते विद्यार्थी देत होत त्यालाच रुढी असे म्हणण्यास हरकत नसावी. त्यांच्या विधानांना काही आधार नव्हता. किंवा त्यांच्या विश्वासामागे पुरावे नव्हते. वाडवडिलांकडून ऐकत आलेल्या गोष्टीवर डोळे झाकून ते सर्वजण विश्वास ठेवत होते. त्यातील काही जण आम्ही हिंदू आहोत म्हणून या या गोष्टींवर विश्वास ठेवतो असे सांगत होते. त्यातील मुस्लीम विद्यार्थी या गोष्टी पाळतो, नमाज पढतो असे सांगत होते. मुळात ते सर्व जण सर्वस्वी वेगवेगळया गोष्टींवर विश्वास ठेवत होते. याचा अर्थ ते सर्व जण बरोबर होते असा होत नाही. त्यांच्या विश्वास ठेवलेल्या गोष्टींमध्ये विसंगती होती. एकाचा देव अमूर्त स्वरुपात होता, दुसऱ्याचा देव माणसासारखा होता, तिसऱ्याच्या देवीला दोन तीन तोंड, आठ-दहा हात, हत्तीएवढी शक्ती असे होते. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, चांगले वाईट यांची सरमिसळ होती. एकाचा देव आकाशातून उतरलेला होता, दुसऱ्याच्या देवाची आई कुमारिका होती. परंतु संयोजकांना या विसंगतीचे आश्चर्यसुध्दा वाटले नाही. त्यांनी त्यावर कुठलेही मत प्रदर्शन केले नाही. मला मात्र त्यांच्या श्रध्दाविषयीचे मूळ कुठे आहे याचा शोध घ्यावासा वाटला. ते सर्व रुढी परंपरेतून आलेले होते. 
 रुढी म्हणजे आजोबा-पणजोबापासून वडिलांना व वडिलांपासून मुला/मुलींना मिळालेल्या श्रध्देचे प्रकार. पुस्तक-ग्रंथ यामधून शेकडो वर्षांपासून एका पिढीपासून पुढच्या पिढीकडे पोचवलेले प्रकार, पारंपारिक श्रध्दांचा उगम अनेक वेळा अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या घटनेमधून होत असतात. काही रुढी कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेल्या असतात. उदाहरणार्थ पुराणकथामधील प्रसंग व घटना एखाद्याच्या कल्पनाविलास असू शकतो; परंतु वर्षानुवर्षे त्याच त्याच गोष्टी सांगत/ऐकत असल्यामुळे त्या खऱ्या वाटू लागतात. व त्या फार विशेष आहेत असे वाटतात. वर्षानुवर्षे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत असल्यामुळे लोक अशा गोष्टींवर डोळे झाकून चटकन विश्वास ठेवतात. यांनाच आपण रुढी म्हणत असतो. कितीही जुनी गोष्ट असली तरी ती खरी का खोटी याचा अंदाज रुढींच्या बाबतीत तरी कधीही लक्षात येत नाही. एखादी खोटी गोष्ट सातत्याने वर्षानुवर्षे सांगत सुटल्यास काही काळानंतर ती गोष्टसुध्दा खरीच वाटू लागते !
 याच रुढीच्या बरोबर आणखी काही गोष्टींचा अशा प्रकारच्या श्रध्दांशी निगडित असते. त्यापैकी मी फक्त अधिकार व अनुभूती यांचा उल्लेख करणार आहे. कुणीतरी अतिमहत्त्वाची व्यक्ती एखादी गोष्ट ठासून सांगत असल्यास त्याविषयी मागचा पुढचा विचार न करता विश्वास ठेवणे हे एक कारण अधिकाराच्या संदर्भात असू शकते. आपल्या धर्माचा किंवा जातीचा एखादा बाबा-बुवा, ताई-माई अमूक अमूक करण्यास सांगितल्यावर ते करत राहणे हीसुध्दा एक प्रकारे अंधश्रध्दाच असते. ख्रिश्चन धार्मिक पोप जे सांगतो त्याविरुध्द एक चकार शब्द काढत नाहीत. मुल्ला-मौलवीने फतवा काढल्यास काही मुस्लीम धर्मांध तरुण स्वत:च जीव द्यायला पण तयार होतात. पोपने जीससची आई मेरी स्वर्गातून अवतरली असे सांगितल्यास आपण डोळे झाकून विश्वास ठेवायलाच हवा, अशी अपेक्षा ख्रिश्चन धार्मिकाकडून केली जाते. इतर धर्मातही अशाच काही गोष्टी आहेत की त्यावर श्रध्दा ठेवण्याची सक्ती केली जाते. 
 विज्ञानातही काही वेळा आपल्याला प्रत्यक्ष पुरावे सहजपणे सापडत नसल्यामुळे वैज्ञानिकांच्या शब्दावर विश्वास ठेवत असतो. परंतु वैज्ञानिक ग्रंथांचा अधिकार हा धार्मिकांच्या अधिकाराहून सर्वस्वी वेगळा आहे. वैज्ञानिक पुस्तकामधील नोंदी वा निष्कर्ष प्रत्यक्ष प्रयोग करून, पुराव्यांच्या आधारे, पुन:पुन्हा तपासणी करून काढलेले असतात. त्या पुन:पुन्हा तपासता येतात. परंतु बाबा-बुवा, धर्मगुरू यांच्या विधानांवर आपण शंका उपस्थित न करण्याची सक्ती असते. ते जे काही सांगतील त्या सर्व खरे मानायचे. संशय घेत असल्यास त्यांच्या व त्यांच्या भक्तांच्या भावनेला व श्रध्दा विषयांना धक्का पोचत असल्यामुळे आपण काहीही बोलायचेच नाही अशी अपेक्षा ते करतात. परंतु अशा प्रकारच्या बिनबुडाच्या विधानांवर खरोखरच विश्वास ठेवायला हवाच का? 
 समज, मी तुला 'तुझा आवडता कुत्रा मेला' असे सांगितल्यास तुला खरोखरच वाईट वाटेल. कदाचित तू ''तुम्हाला खात्री आहे का? तुम्हाला कसे कळले? नेमके काय झाले?'' असे प्रश्न विचारशील. जर मी ''मला नेमके काहीही माहित नाही. माझ्याजवळ पुरावा नाही. परंतु तो मेला आहे असे सकाळपासून वाटत आहे.'' असे सांगू लागल्यास तू माझ्यावर चिडशील. अशा प्रकारे 'वाटण्याला' काही अर्थ नाही म्हणून माझ्या विधानांवर विश्वास न ठेवता तूच कुत्रा खरोखरच मेला आहे का याचा खात्रीशीर पुराव्याचा शोध घेशील. खरे पाहता तुला पुरावा हवा आहे नुसत्या भावना नको  आहेत.
 आपल्याला अनेक घटना घडाव्यात किंवा घडू नये असे अनेक वेळा वाटत असते. कुणीही आजारी पडू नये, चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये आपल्या मुला-मुलींना विनासायास प्रवेश मिळावा असे वाटत असते. त्यातल्या काही आपल्या मनाप्रमाणे घडतात काही घडत नाहीत. घडल्यास देवाची कृपा, न घडल्यास आपले नशीब म्हणून आपण आपले समाधान करून घेत असतो. गंमत म्हणजे वेगवेगळया लोकांच्या इच्छा वेगवेगळया प्रकारच्या असतात. त्या अगदी एकमेकांच्या विरुध्द असतात. छेद देणारे असतात. मग मात्र आपल्या कुठल्या भावना बरोबर होत्या, कुठल्या चुकीच्या होत्या हे कसे ठरवता येईल? कुत्रा मेला आहे हे फक्त मनात वाटण्याऐवजी त्याचे हृदय थांबले आहे का? याची खात्री करून घेतल्यास समजून चुकेल. किंवा कुणीतरी पुराव्यानिशी सांगितल्यास त्यावर विश्वास ठेवता येईल.
 काही जण आपल्याला आपल्या भावनांच्यावर विश्वास ठेवण्याचा आग्रह करत असतात. 'भावनांच्यावर विश्वास नसल्यास तुमचे तुमच्या मुलावर प्रेम आहे की नाही हे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.' असा त्यांचा दावा असतो. परंतु हा वाद निरर्थक आहे. माझे मुलावरील प्रेम फक्त भावनेतूनच व्यक्त होत नसते. ते माझ्या अनेक छोटया मोठया गोष्टींवरूनही ठरवता येते. त्याच्यासाठीच म्हणून माझा मी किती वेळ देतो, त्याचा अभ्यास मी कशाप्रकारे घेतो, त्याची कशी मदत करतो, इत्यादी अनेक छोटया मोठया घटनेतून, प्रसंगातून आपण आपल्या प्रेमाची ग्वाही देऊ शकतो. प्रेम समजून घेण्यासाठी साक्षात्कार वा अनुभूतीची गरज नाही. भावनेपेक्षा इतर अनेक गोष्टींतून समजू शकते. आपल्या डोळयातून व्यक्त होणारी संज्ञा, आवाजातील चढ-उतार, देहबोली, कळत नकळत केलेली मदत, हे आपल्या प्रेमाचे पुरावेच असतात. 
 मनातल्या आत जे वाटत असते त्यालासुध्दा विज्ञानात स्थान आहे. विज्ञान तेवढे कोरडे नाही. परंतु 'ते वाटते' पुराव्यानिशी सिध्द करण्यास उद्युक्त करणारे हवे. काही प्रतिभाशाली वैज्ञानिकांना मनातल्या मनात काही तरी वेगळे, अचूक गोष्टींचा ध्यास लागलेला असतो. परंतु तेवढया वाटण्यावरती ते थांबत नाहीत व वाटणे पुरेसे ठरत नाही. आपल्याला सुचलेल्या(भन्नाट !) कल्पनाची खात्री करून घेतल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. त्यासाठी वेळ खर्ची घालतात. ग्रंथालय उलथी पालथी करतात. प्रयोगांची जुळणी करतात. व मनातल्या या कल्पनेची शहानिशा करून घेतात. त्यामुळे फक्त भावनेवर भरवसा न ठेवता निरिक्षण करून खातरजमा करून घेण्यातच शहाणपण आहे. वैज्ञानिक आपला आतला आवाज ओळखून सिध्दांताची मांडणी करत असतात. अनेक वेळा त्यांचा कयास चुकतही असतो. परंतु प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षण यामधून या कल्पना सिध्दांत म्हणून जगापुढे येतात. त्या केवळ भावनोद्रेक नसतात.
 याचप्रकारे रुढी-परंपरांच्याबाबतीतसुध्दा आपण वेगळया प्रकारे विचार करू शकतो. काही वेळा काही रुढी-पध्दती आपल्याला उपकारकही ठरत असतात. मूलत: जगातील सर्व सजीव आपापल्या भोवतालचे वातावरण व परिस्थितीशी जुळवून घेत जगत असतात. सिंह, वाघ जंगलात राहतात. माकडं झाडावरील पाला, फळे खाऊन  जगतात. माशांना पाण्याशिवाय जगता येत नाही. त्याप्रमाणे माणूस-माणूससुध्दा एक सजीव प्राणी-माणसातच वावरणे पसंत करतो. इतर प्राण्यांसारखे आजच्या काळातली माणसं आहारासाठीच म्हणून शिकारीला जात नाही. आपण आपले आहार पदार्थ पिकवतो, साठवतो, इतर माणसांकडून विकत घेतो. ती माणसं इतर माणसाकडून विकत घेतात, विकतात. ज्याप्रकारे पाण्यावाचून मासे जिवंत राहू शकत नाहीत त्याचप्रकारे सामान्यपणे माणसं माणसांपासून लांब राहू शकत नाहीत. इतर माणसांशी व्यवहार करताना विचार करावा लागतो व तो अकलेचा भाग असतो व त्यासाठी मेंदूचा वापर करावा लागतो या विकसित मेंदूमुळेच आपण इतरांशी व्यवहार कसा करावा हे शिकतो व शिकण्याचे माध्यम भाषा असते. 
 मुलं आपापल्या समाजाची आपापल्या भोवतालची भाषा शिकत असतात. त्यांचा मेंदू एखाद्या टीपकागदासारखा मोठया प्रमाणात पारंपारिक माहिती टिपून घेत असतो, साठवत असतो. मुलांच्या मेंदूत अशा हजारो, लाखो गोष्टी साठवल्या जात असतात. त्यात अगदी क्षुल्लक माहितीही असू शकते. चुकीचीपण असू शकते. अपायकारक माहितीपण असू शकते भूताखेताच्या विषयीची असू शकते. देव, देवदूत, आकाशातल्या पऱ्या अशा चमत्कृतीयुक्त माहितीही असू शकते. 
 कदाचित अशा प्रकारची चुकीची माहिती साठवणे मुलांच्या दृष्टीने वाईट असली तरी त्याला उपाय नाही. कारण वयाने मोठी असलेली माणसं जे काही सांगतात-चुकीची असो की बरोबर असो, चांगली असो की वाईट-त्यावर लहानांना विश्वास ठेवावाच लागतो. काही माहितींना कुठलाही आधार नसतो. त्या किमान तर्कसुसंगत असाव्यात अशी अपेक्षा असते. मुलांच्या साठवणीत सर्व प्रकारची परंपरागत माहिती साठवली जाते. मग मुलं मोठी झाल्यावर काय होते? तीच मुलं आपल्या पुढच्या पिढीतल्यांना तशीच्या तशी सांगतात. त्यामुळे अशा प्रकारे सांगितलेली गोष्ट-ती कितीही चुकीची वा वाईट असली तरी-अनेक पिढया विश्वास ठेवत जातात. त्यासंबंधी प्रश्न विचारले जात नाहीत व ही परंपरांची साखळी कधीच तुटत नाही. 
 स्वर्ग-नरक यावरचा विश्वास, पुराणकथातील चमत्कारिक घटना, सत्यनारायण-कडवा चौथ सारख्या पूजा, व्रत वैकल्ये, प्रार्थनेतून रोग बरा होणे, गणपती दूध पिणे, समुद्रातील पाणी गोड लागणे इ. इ. अनेक गोष्टी कुठल्याही पुराव्यावाचून स्वीकारल्या जातात. लाखो-करोडो लोक अशा गोष्टींवर डोळे मिटून विश्वास ठेवतात. त्यांची ती श्रध्दास्थाने होतात. कदाचित त्यांना या गोष्टींबद्दल एकही अडचणीचा प्रश्न न विचारता, कुठलीही शंका-संशय उपस्थित न करता विश्वास ठेवायलाच हवे असे अगदी लहानपणापासूनच शिकवून ठेवलेले असेल, सक्ती केली असेल. 
 गंमत म्हणजे यातील अनेक गोष्टी तर्कविसंगत असतात. मनात गोंधळ निर्माण करणारे असतात. हिंदूंची शिकवण वेगळी, मुस्लिमांची वेगळी, ख्रिश्चनांची आणखीन वेगळी. जेव्हा हे सर्वजण मोठे होतात तेव्हा आपलेच तेवढे बरोबर इतर चूक अशी भावना बळावत जाते. हिंदूंमध्ये अठरापगड जाती असल्यामुळे ब्राह्मणांचे वेगळे, मराठयांचे वेगळे, कुणबींचे वेगळे, लिंगायत, कायस्थ, यादव, नंबूद्री, अय्यर, अय्यंगार इ.इ.चे आणखी भलतेच व या सर्वांना आपलेच बरोबर व इतरांनीही तसेच वागायला हवे असे वाटत असते. 
 श्रध्दा-अंधश्रध्दांच्या या गोंधळलेल्या परिस्थितीत आपण नेमके काय करायला हवे? तुला हे फार जड जाईल कारण तू अजून लहान आहेस. तरीसुध्दा काही बाबतीत तू प्रयत्न करू शकशील. पुढच्या वेळी कुणीतरी तुला काही महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करत असल्यास तू थोडासा विचार कर. ''हे जे काही सांगत आहेत त्याला काही पुरावा आहे का? किंवा ते फक्त परंपरा, अधिकार, अनुभूतीच्या आधारावर ते विधान करत आहेत का?'' याचा विचार करू लागल्यास तुझे तुलाच अशा विधानातील विसंगती लक्षात येऊ लागेल. त्यामुळे त्यांना ''याचा पुरावा काय?'' असा प्रश्नही तू विचारू शकशील. जर ते गुळमुळीत अस्पष्ट उत्तर देत असल्यास अशा विधानांवर विश्वास ठेवायचा की नाही हे तुझे तूच ठरव.
 पत्र लांबले आहे; परंतु हे सर्व सांगण्याची गरज होती. म्हणूनच तुझा वेळ घेत आहे. 
-तुझा आजोबा
(मूळ : रिचर्ड डॉकिन्सचा लेख)
-प्रभाकर नानावटी

No comments:

Post a Comment