Tuesday, May 21, 2013

श्रद्धा तपासण्यात गैर काय?


विज्ञान जर मन मानत नाही, तर मानसोपचार तज्ञ कां तयार झाले? अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांमध्येच ताळमेळ नाही. त्यांनी समाजाची दिशाभूल केल्यामुळे आज समाज श्रद्धेपासून दूर गेला आहे. त्यामुळे श्रद्धा म्हणजे काय, हे जेव्हा आपण लोकाना समजावून सांगू, तेव्हाच खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेचे निर्मूलन होईल असे नरेंद्र महाराज यवतमाळ येथील प्रवचन सोहळयात म्हणाले.
तथाकथीत अध्यात्मवादी समाजाची दिशाभूल कशी करतात याचा वरील प्रवचन म्हणजे एक नमुना ठरेल. अध्यात्मवाद्याना खरे अध्यात्म जसे समजलेले नाही तसेच त्यांचे विज्ञानाबद्दलचे अज्ञान म्हणजे निव्वळ बडबड या पलीकडे त्याला महत्व नाही.
विज्ञान अनुभवावर आधारीत आहे तसेच ते अनुमानालाही महत्व देते. एका उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल. 'इलेक्ट्रॉन' हा दिसत नाही पण त्याचे अस्तित्व वैज्ञानिक मानतात. ते कसे? इलेक्ट्रॉन्सच्या गतीचे परिणाम आपल्याला दृश्य स्वरुपात पहाता येतात. टेलिव्हिजनच्या पडद्यावर इलेक्ट्रान्सचा नाच चालू असतो. त्याचा परिणाम म्हणून पदडद्यावर चित्र उमटते. अणुच्या अंतरंगातील इलेक्ट्रान, प्रोटान्स वा न्यूट्रान्स दिसत नाहीत. पण त्यांचे अस्तित्व अप्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होते. म्हणून तर न्यूट्रान्स कणांच्या माऱ्यामुळे किरणोत्सारी द्रव्याचे जड अणू फुटतात व प्रचंड उर्जा प्राप्त होते.

विज्ञानात अदृश्याचे अस्तित्व गृहीत धरतात. त्यांच्या वर्तणुकीचे काही सिद्धांत मांडले जातात. त्यातून अनुमान काढले जाते. अखेरीस तपासण्याजोगा परिणाम मिळविला जातो. विज्ञानाची गृहिते ह्या श्रद्धा नव्हेत. श्रद्धा तपासायची नसते असे श्रद्धावादी म्हणतात. विज्ञानाचा आग्रह असतो श्रद्धा तपासण्याचा. गृहितावरुन काढलेले अनुमान वा निष्कर्ष चुकीचा ठरला तर गृहीत नाकारले जाते. न्यूटनची काही गृहिते चुकली. ती आज आपण मानत नाही. न्यूटन कितीही थोर असला तरी!
श्रद्धा तपासून ती सिद्ध झाली तर त्याला आपण विश्वास म्हणू या. विज्ञान विश्वासावर आधारीत आहे. बटण दाबले की दिवा लागतो हा विश्वास म्हणजे विज्ञान. श्रद्धा (म्हणजेच गृहिते) तपासून विज्ञानाने मानवी दु:खाचा परिहार करण्यात अमोल कामगिरी बजावली आहे. एके काळी देवीच्या कोपामुळे देवीचा आजार(अंगावर फोड येणे) होतो ही श्रद्धा होती. देवी, कांजिण्या, गोवर, मलेरिया, कॉलरा इ. संसर्गजन्य आजार विषाणू व जंतुंमुळे होतात हे विज्ञानाने तपासले देवीचा कोप ही श्रद्धा विज्ञानाने झुगारुन दिली. त्याचा परिणाम म्हणून देवीचा रोगी कळवा व 1 हजार रु. मिळवा ही सरकारी घोषणा आली.
एकेकाळी पृथ्वी स्थिर आहे व सूर्य फिरतो ही श्रद्धा होती. ही श्रद्धा हा भ्रम होता हे कोपर्निकस-गॅलिलिओच्या संशोधनातून सिद्ध झाले. अशा विविध भ्रमांचे निराकरण विज्ञान करीत आले आहे. आजही करीत आहे. पहावे, तपासावे, प्रयोग करावेत, कल्पना लढवाव्यात व पुन्हा तपासावे या पद्धतीने निसर्गाची असंख्य गुपिते विज्ञानाने उलगडली. ह्या कार्यात अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तरी त्यांनी आपले जीवित कार्य चालूच ठेवले. हे वैज्ञानिक खरे आध्यात्मिक. अध्यात्माचा अगदी साधा आणि सोपा आशय आहे. अध्यात्माचा एक मात्र निकष म्हणजे ज्यामुळे प्रेम, परोपकार करुणा, बंधुता, सहनशीलता अशा मूल्यांची जोपासना होते ते खरे अध्यात्म. विविध आजारावर विज्ञानाने केलेली मात, भौतिक गरजा भागविण्यासाठी निर्माण केलेल्या विविध वस्तू, विश्वाच्या रचनेचे उलगडत ठेवलेले रहस्य यातून सौंदर्य, कला व समृद्धी यांचा लाभ आपणास होत आहे. तथाकथीत अध्यात्मवाद्यांचा आत्मा ज्या शरीरात वास करतो त्या शरीराच्या अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या मूलभूत गरजा भागविणे हे एक प्रकारचे अध्यात्माचेच कार्य होय. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा अध्यात्मवाद्यांची प्रवचने भागवतील काय? ते वापरत असलेल्या कार, संगणक, ध्वनीयंत्रणा, दूरदर्शनची चॅनेल्स कशी निर्माण झाली? अध्यात्मवाद्यांनी विज्ञानाचे आभार मानले पाहिजेत. तसे न करणे हा कृतघ्नपणा होईल.
विज्ञान मन मानत नाही हे अज्ञान आहे. मन हे वस्तुरुप नाही. ती अमूर्त संकल्पना आहे. हे विज्ञानाचे गृहीत आहे. मनोविज्ञानाने फ्राईडपासून ते आजतागाईत प्रचंड संशोधन केले आहे. त्याचा सुपरिणाम म्हणजे मानसिक आजारावर मनोविज्ञानाने मिळवलेले नियंत्रण. सिझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक आजारावर मनोविज्ञान नियंत्रण ठेवू शकते. मनोविज्ञानाचा विकास होण्यापूर्वी समाजात सिझोफ्रेनियाच्या रोग्याना भूताने झपाटले असे समजून अनन्वित अत्याचार होत असत. आजही ते चालू आहेत. परवा घडलेली घटना पहा-
विरारजवळ अनिता नावाच्या मुलीने इतरांच्या मदतीने ज्योत्स्ना तांडेल या 18 वर्षांच्या तरुणीला होमात ढकलले. तिचा मृत्यू झाला. पोलीस तपासात दोन कारणे पुढे येत आहेत. मूल प्राप्त होण्यासाठी ज्योत्स्नाचा नरबळी द्यावयाचा होता. व ज्योत्स्नाचा कांजिण्याचा आजार ज्या देवीच्या कोपामुळे झालाय, त्या देवीची शांती करायची होती.
अनिता सांगते, तिच्या अंगात देवी संचारली आहे. एक नाही तर अनेक देवीचा संचार तिच्यात झालाय. मनोविज्ञान सांगते हा अनिताचा मनाचा आजार. तो बराही होऊ शकतो. पण देवीचा आत्मा अनितात आला म्हणजे काय? शरीराविना आत्मा किंवा मनाचा अनेक अंगानी तपास केला तर पुरावा मिळत नाही. म्हणून मुक्त संचार करणारे मन वा आत्मा नाही हा विज्ञानाचा निष्कर्ष आहे. मन हा मेंदूतील रासायनिक विद्युत क्रियेचा अविष्कार आहे. मेंदूविना स्वतंत्र मन व आत्मा नाही असा विज्ञानाचा निष्कर्ष आहे. भूत, चेटूक, पितर, भानामती, करणी यांच्या मुळाशी असलेला आत्मा हा केवळ कल्पना विलास आहे.
तात्पर्य वैज्ञानिक दृष्टिकोन हा ज्ञानाचा पाया असावा. अंधश्रद्धा निर्मूलन हे दिशाभूलीपासून समाजाला वाचविण्याचे साधन आहे. आम्हाला ताळमेळ आहे. अध्यात्मवाद्यांनी ताळमेळ ठेवावा. श्रद्धेचा निकष ज्ञान असावे अज्ञान नव्हे. श्रद्धा तपासाव्यात, चुकीच्या श्रद्धांचा त्याग करावा असे सांगण्यात गैर काय?
-प्रा. प. रा. आर्डे

No comments:

Post a Comment